मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या काल रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांवर शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झाले. किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांना बाजूला करत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडीची काच फुटली. किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जोपर्यंत पंचनामा होत नाही तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही अशी सोमय्यांनी भूमिका घेतली होती.
या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतली तसेच यांच्या गाडीवर फेकण्यात आलेला दगड देखील त्यांनी पोलिसांना आणि माध्यमांना दाखवला. पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, “पोलीस स्टेशनच्या आवारात शिवसैनिकांचे ७० ते ८० गुंड कसे पोहोचले आहेत. पोलीस आयुक्त जोपर्यंत इथं येऊन अधिकाऱ्यांना सस्पेंड करत नाहीत तोपर्यंत या ठिकाणावरून हलणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसैनिक हल्ला करतात. उद्धव ठाकरे यांच्या गुंडांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, पोलीस आयुक्त संजय पांडे उद्धव ठाकरे यांचे नोकर असल्यासारखे वागत आहेत”.
या हल्ल्याप्रकरणी सोमय्यांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर –
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “दोन दिवसांपासून असंतोषाचं वातावरण राणा दाम्पत्यानं निर्माण केलं. यापूर्वी त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्याकडे मदत मागितली. यामुळं हायव्होल्टेज ड्रामा भाजपच्या माध्यमातून राणा कंपनीकडून करण्यात आला असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच एवढं सगळं होऊनही किरीट सोमय्या साडे नऊ वाजता मी तिकडे पोहोचतोय असं सांगतात. शिवसैनिकांची माथी भडकवू नका, असं विनंतीपूर्वक सांगून देखील महाराष्ट्रात, मुंबईत अराजक पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतात. मातोश्री, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या संवेदनशील विषयात हात घातला की शिवसैनिक भडकणार हे माहिती होतं. तरीही मुद्दाम हे करण्यात आलं आहे. हायव्होल्टेज ड्रामा हनुमान जयंतीपासून सुरु झाला त्याची परिनिती आजच्या घटनेत झाली. माध्यमं चौथा स्तंभ आहे, तुम्ही देखील विचारलं पाहिजे. खरंच त्यांना तिथे जाण्याची गरज होती का? असा सवाल ही किशोरी पेडणेकर यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

