🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या भ्रष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना विविध कारणांनी वादग्रस्त ठरल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कविता नावंदे यांच्या कार्यकाळात २१ व्यायाम शाळा, साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान या योजना राबविताना अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये अधिकाराचा वापर करत नावंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे.वरील आदेशानुसार नावंदे यांना क्रीडा उपसंचालक यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (पद अधिग्रहण अवधी, स्वियेत्तर सेवा ) निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे (नियम १९८१ मधील कलम ६८ नुसार नावंदे यांना निलंबन निर्वाह व इतर भत्ते दिले जातील.
याआधी कविता नावंदे भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात त्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांच्या निलंबनानंतर शासनाने नावंदे यांच्या एकाधिकारशाहीस लगाम घालत चौकशी अहवालावर निर्णय दिला. तसेच त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी खेळाडू, क्रीडा संघटना आणि या कार्यालयात छळ सोसावा लागलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, निलंबन काळात कविता नावंदे यांना इतर खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, असे आढळून आल्यास हे भत्ते मिळणार नाहीत. तशा आशयाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असले, असे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुनील हंजे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
