🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता जवळपास ७ वर्षे झाली आहेत. तो जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक होता. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत वीरेंद्र सेहवागने जगभरातील गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. त्याने खेळलेल्या अनेक खेळी आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. सेहवाग इतका यशस्वी फलंदाज असूनही, त्याच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. या गोष्टीचा खुलासा आता खुद्द सेहवागने केला आहे.
२००८ साली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मालिका खेळण्यासाठी गेला होता. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने वीरेंद्र सेहवागला काही एकदिवसीय सामन्यांमधून वगळले होते. या गोष्टीनंतर सेहवागने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार सुरू केला होता. अलीकडेच क्रिकबझशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘आम्ही २००८ साली ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळत होतो. तेव्हा माझ्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. मी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत १५० धावा केल्या. एकदिवसीयमध्ये मी ३-४ सामन्यांमध्ये धावा करू शकलो नाही. त्यानंतर धोनीने मला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. त्यामुळे मी एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा विचार केला आणि ठरवले की मी कसोटी क्रिकेट खेळत राहीन.
वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘मला त्यावेळी सचिन तेंडुलकरने एकदिवसीय मधून निवृत्ती घेण्यास थांबवले होते. तो मला म्हणाला, ‘तुझ्या आयुष्यातील हा एक वाईट टप्पा आहे त्यामुळे थोड थांब. या प्रकरणाचा सखोल विचार करून पुढे काय करायचे ते ठरव.’ सेहवाग पुढे म्हणाला की, ‘सुदैवाने मी त्यावेळी वनडेतून निवृत्ती जाहीर केली नाही.’ त्यानंतर सेहवाग ७-८ वर्षे भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला. २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो महत्वाचा भाग राहिला होता.
सीबी मालिकेत सेहवाग अपयशी ठरला
भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या कॉमनवेल्थ बँक मालिकेत वीरेंद्र सेहवाग चांगलाच फ्लॉप झाला होता. त्याला ४ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली ज्यात सेहवागने ६, ३३, ११ आणि १४ धावा केल्या. यानंतर अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या २ सामन्यांमध्ये त्याला वगळण्यात आले. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पुनरागमन केले. मात्र त्याला केवळ १४ धावा करता आल्या. सीबी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय नोंदवला. टीम इंडियाने बेस्ट ऑफ थ्री फाइल्समध्ये ऑस्ट्रेलियाचा २-० ने पराभव केला. मात्र या सामन्यांसाठी सेहवागचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
