🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने ३१ मे २०२२ पर्यंत राज्यांना देय असलेली वस्तू आणि सेवा कर (GST) भरपाईची संपूर्ण रक्कम भरली आहे. याअंतर्गत केंद्राने राज्यांना ८६,९१२ कोटी रुपये दिले आहेत. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. यापैकी २५,००० कोटी रुपये जीएसटी नुकसान भरपाई निधीतून जारी करण्यात आले आहेत. त्याच वेळी, उर्वरित ६१,९१२ कोटी रुपये केंद्राने स्वतःच्या संसाधनातून जारी केले आहेत. राज्यातील सरकार सतत केंद्राकडे GST परताव्याची मागणी करत होते. यामध्ये राज्याला सर्वाधिक १४, १४५ कोटी मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे.
फडणवीस म्हणाले, “31 मे 2022 पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक 14,145 कोटी देण्यात आले. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज 1 जून पासून शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार?”
राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची ‘ढकलगाडी’ करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार? आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
जीएसटीचे पैसे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी नाहीत – अजित पवार
जीएसटीचे पैसे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यासाठी आले नाहीत. पेट्रोल डिझेलचे दर आम्ही सुद्धा कमी केलेत. मागच्या काळात येणारे पैसे आता आले आहेत. त्याचा आणि याचा काही एक संबंध नाही, असे रोखठोक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात ते एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यावरून भाजपकडून सातत्याने महविकास आघाडी सरकारवर टीका करत असते. इंधनाचे दर कमी करा असे म्हटले तर, हे जीएसटीच्या थकीत परताव्यावर बोलत असतात, असा आरोप भाजकडून नेहमी करण्यात येतो.आता याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे.
“विकासकामांसाठी हे जीएसटीचे पैसे आहेत. या पैशांचा योग्य ठिकाणीच वापर झाला पाहिजे. जीएसटीचे १५००० कोटी येणे अजूनही बाकी आहे. आता आलेले पैसे हे मागील थकबाकी आहे. ते टप्प्याटप्प्याने येत आहेत. राहिलेला उर्वरित पैसे लवकर द्यावेत ही माफक अपेक्षा. एकूण २९००० कोटी रुपये येणे बाकी होते, असे अजित पवार म्हणाले.
भाजपच्या आरोपावर अजित पवार म्हणाले, जीएसटीचे आलेले पैसे हे इंधनदर कपातीसाठी आलेले नाही. राज्यात इतरही अनेक समस्या आहेत. शेवटी राज्याचा गाडा ही नीट चालला पाहिजे. अनेक गरजू लोक आहेत त्यांच्या समस्या आहेत. त्या सोडण्यासाठी या पैशाचा वापर करता येईल, असेही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
