🕒 1 min read
नवी दिल्ली – मोदी सरकारने लष्कर भरतीची युवकांसाठी नवीन अग्निपथ योजना आणली आहे. मात्र या योजनेवरून देशभरात वातावरण पेटलेले दिसून येत आहे. अग्निपथ योजनेला देशभरातून जोरदार विरोध होत आहे. देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन अग्निपथ योज़नेविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. विद्यार्थी आंदोलनाच्या आज देशभरातील सुमारे ७०० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मागील दोन दिवसांत मोठ्या हिंसाचारात रेल्वेचं कोट्यवधींचं नुकसानही झालं आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांकडून या योजनेला विरोध केला जात आहे. काँग्रेसनंतर आता आम आदमी पक्षानेही या योजनेला विरोध केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनिष सिसोदिया यांनी ट्विट करत अग्निपथ योजना आणि या दरम्यान घडणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे. ”जर अग्निपथ योजना खरंच एवढी चांगली असेल तर एक नियम बनवायला पाहिजे. देशातील प्रत्येक आमदार आणि खासदाराची मुले वयाची १७ वर्षे पूर्ण केल्यास सर्वप्रथम अग्निपथ योजनेचा लाभ घेतील. ४ वर्षे नोकरी करतील”, अशी मागणी मनिष सिसोदिया यांनी केली आहे.
दरम्यान अग्निपथ योजनेच्या विरोधात उठलेल्या आंदोलनाला बिहारमध्ये अत्यंत हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनातील भडकलेल्या जमावानने ट्रेन आणि इतर मालमत्तेला आग लावली आहे. ठिकठिकाणी तोडफोड केली आहे. यामुळे पोलिसांना बिहार राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करावी लागली आहे. या आंदोलातून बिहारमध्ये ३२५ जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारबरोबरच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये अग्निपथ योजनेला विरोध वाढताना दिसत आहे. तेलंगणामध्ये देखील हिंसक आंदोलन सुरु असून, तिथेही एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
