परळी : भाजप नेते व लोक नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांची गोपीनाथ गडावर उपस्थिती महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी आहे. यावेळी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
सध्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. सोबतच राज्यसभेची निवडणूकही सुरु आहे. पंकजा मुंडे यांचं नाव आता विधानपरिषेदेसाठी चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर भाष्य करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, “सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. अनेकजण मला विचारतात की आता काय? पण माझी चिंता करुन नका. उद्या काय होणार, काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं, यापेक्षा काय हवं. या पराभवानं मला दिल्लीला नेलं. शिवराजसिंहांसारखे सात्विक लोक लाभले”.
पंकजा मुंडे यांच्या हस्ते शिवराज सिंह चौहान यांचं गोपीनाथ गडावर स्वागत करण्यात आलं. “ज्यांच्या नावातच शिव आणि जनतेच्या मनात ज्यांचं राज आहे, अशा शिवराजसिंह चौहान यांचं मी स्वागत करते. सकाळपासून लोक तुमच्या प्रतिक्षेत आहे. तुमचं आमचं नातं मुंडे साहेबांपासून आहे. इथे तुम्ही मुंडे साहेबांच्या अंत्यविधीला आला होता. त्याच ठिकाणी आज तुम्ही आला आहात. तुम्ही मध्यप्रदेशात जी किमया करुन दाखवली, जे इतर कोणत्याही राज्याला जमलं नाही. तुम्ही ओबीसी आरक्षण टिकून धरलं. महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी, प्रेरणा लाभो. शिवराजसिंह चौहान यांची प्रेरणा घेऊन त्यांनी ओबीसींची आरक्षण मिळवून द्यावं. राजकारणासाठी नाही तर ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण हवं, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
गरीब आणि वंचितांचे नेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यासोबत नाहीत. पण आज शिवराजसिंहांसारखे लोक आमच्यासोबत जोडले जातात. तेव्हा आजही मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं. आज मला त्या दिवसाची आठवण येते. आज ८ वं पुण्यस्मरण आहे मुंडे साहेबांचं. मोदी सरकारलाही ८ वर्षे झाली आहेत. जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला. हा गोपीनाथ गड माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी आहे जे सकाळपासून तुमची वाट पाहत आहेत. मी मध्यप्रदेशची प्रभारी असेन नसेन पण तुमच्याशी जोडलेले आमचं नातं कायम राहील, अशा शब्दात भावुक होऊन पंकजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्यस्मरणाच्या दिवशी गंभीर असलेल्या ताई आज आनंदी दिसत आहेत. सुर्योदय कधी काळा असतो का? असं मला विचालं तर ३ जूनचा सूर्य काळाच दिवस घेऊन उगवला, असं मी म्हणेल. आज मोहन भागवतांनी सांगितलं की आम्ही मुस्लिमविरोधी नाही. आम्हाला तो वाद मिटवायचा आहे. तेच काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. ते हिंदू मुस्लिम भेद करत नव्हते. समाजाची सेवा हाच त्यांचा धर्म होता, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
