मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाने त्यांच्या पदार्पणाच्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले. गुजरातला चॅम्पियन बनवण्यात कर्णधार हार्दिक पंड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकच्या चांगल्या कामगिरीमुळे संघ आयपीएल हंगामात सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिला. फलंदाजीसोबतच हार्दिक पंड्याने गोलंदाजीत महत्त्वाच्या वेळी बळी मिळवत संघाला यश मिळवून दिले. आयपीएल च्या १५ व्या मोसमातील चमकदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पंड्याने भारतीय टी-२० संघात पुनरागमन केले आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीतील सातत्यावर अजूनही शंका आहे. हार्दिक भारतीय संघासाठी सतत अशी गोलंदाजी करू शकेल का? असा प्रश्न अझरुद्दीन यांनी उपस्थित केला आहे.
अझरुद्दीन यांनी खलीज टाईम्सशी बोलताना सांगितले की, ‘हार्दिक पंड्यामध्ये भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करण्याची भरपूर क्षमता आहे. त्याने भारतीय संघासाठी यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. मात्र दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर आहे. आता त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने आयपीएल मध्ये अनेक वेळा त्याच्या कोट्यातील चार षटकेही पूर्ण केली आहेत. पण भविष्यातही तो याच पद्धतीने गोलंदाजी करू शकेल का? हे मात्र आपल्याला माहित नाही. हार्दिक एक अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याने गोलंदाजी सुरू ठेवावी असे आम्हाला वाटते.
दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पंड्याने आयपीएलद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तो आयपीएलमध्ये गोलंदाजी करू शकेल की नाही याबाबत क्रिकेटच्या त्यांच्या मनात साशंकता होती. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात हार्दिकला गोलंदाजी करता आली नव्हती. फलंदाजीतही तो विशेष काही दाखवू शकला नाही. पण आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या काही सामन्यात हार्दिकने १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.
हार्दिक पंड्याने आयपीएलच्या फायनलमध्येही ३ गडी बाद केले
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात हार्दिकने गोलंदाजीत ३ बळी घेतले होते. तर फलंदाजीतही कमी धावांची पण उपयुक्त खेळी खेळली होती. यानंतर त्याच्या फिटनेसबद्दलच्या शंका दूर झाल्या असल्या तरी भारताच्या माजी कर्णधाराने मात्र त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अझरुद्दीन म्हणाले, ‘आयपीएलच्या फायनलमध्ये त्याने चांगली कामगिरी करत खेळ पूर्णपणे बदलून टाकला. त्याने चार षटकांत तीन बळी घेतले आणि नंतर ३४ धावांची उपयुक्त खेळी केली. हार्दिक पंड्या हा प्रतिभावान खेळाडू आहे फक्त त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य याची गरज आहे.’
महत्वाच्या बातम्या:


