🕒 1 min read
मुंबई : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन केले आहे. भारताने विशाखापट्टणम आणि राजकोट येथील टी-२० सामन्यामध्ये पाहुण्या संघाचा पराभव करून मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. मालिकेतील पाचवा आणि निर्णायक टी-२० सामना रविवारी बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसतील. चौथ्या टी-२० मधील विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेकीच्या वेळी उजव्या हाताने नाणेफेक करण्याचे संकेत दिले आहेत.
पंतने असे सांगितले कारण, आतापर्यंतच्या मालिकेतील चारही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा नाणेफेकीचा बॉस होता. म्हणजेच पंतने चारही वेळा नाणेफेक गमावली आहे. राजकोटमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. भारतीय संघाने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १६.५ षटकांत ८७ धावांत गारद झाला. भारतीय संघाने हा सामना तब्बल ८२ धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा टी-२० मधील धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे.
सामना संपल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला की, ‘आम्ही आखलेली योजना नीट अंमलात आणण्याबद्दल आणि चांगले क्रिकेट खेळण्याबद्दल कायम बोलत होतो. बघा, निकाल तुमच्या समोर आहेत. जो संघ चांगला क्रिकेट खेळतो तो सामना जिंकतो. कदाचित पुढच्या सामन्यात मी उजव्या हाताने नाणेफेक करून जिंकेन. यासाठी मी सकारात्मक राहीन. या सामन्यात खरच दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली. त्यांच्या कामगिरीने मी खूप खूश आहे.’
दिनेश कार्तिकने २७ चेंडूत ५५ धावा केल्या
भारतासाठी दिनेश कार्तिकने २७ चेंडूत ५५ धावा केल्या तर हार्दिक पांड्याने ३१ चेंडूत ४६ धावा केल्या. या सामन्यात सलामीवीर इशान किशनने २७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज लुगी एन्गिडीने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेकडून केवळ ३ फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. भारताकडून आवेश खानने सर्वाधिक ४ बळी घेतले.
महत्वाच्य बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

