🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार व प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा अटक प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये तीन-चार दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपवण्याचा प्रयत्न होत आहे.
फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला की, नवनीत राणा मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना चहा अथवा पाणी दिले गेले नाही. पण संजय पांडे हे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्यावर तुमचा राग का आहे? त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की नवनीत राणा चहा पीत आहेत, आरामात बसलेल्या आहेत. त्यामुळे सध्या सुरु असलेला प्रकार खूप भयंकर आहे, असे विद्या चव्हाण म्हणाल्या.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, “मला देवेंद्र फडणवीस यांना आठवण करुन द्यायची आहे की तुम्हीही एकेकाळी मुख्यमंत्री पदावर विराजमान होतात. या राज्याचा व देशाचा कारभार हा संविधानावर चालतो. कुणीतरी सांगितलं की, तुम्ही हनुमान चालिसा लावा. फडणवीस यांनीही काल हनुमान चालिसा बोलून दाखवली. मात्र मला फक्त इतकं विचारायचंय की हनुमान चालिसा म्हणण्याचा व राजकारणाचा काय संबंध आहे? मी स्वत: देवपूजा केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. हनुमान चालिसा, शिवस्तोत्र मलाही येतं, पण त्याचं प्रदर्शन करण्याची गरज मला वाटत नाही. कारण देशाचा कारभार चालवताना सर्वधर्मसमभावाचे पालन केले गेले पाहिजे. त्यामुळे एखाद्याच्या घरावर जाऊन आंदोलन करणे अत्यंत चुकीचे आहे.”
शिवसेना आणि भाजपच्या या संघर्षात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने उडी घेतल्याने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केल्याने, आता भाजपकडून या टीकेवर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
