“…त्यात देवेंद्र फडणवीस यांना दुःख वाटण्याचे कारण काय?”, शरद पवारांवरील टीकेवर महेश तपासे यांचा सवाल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) जातीवादी आहेत, अशा प्रकारचे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यालाच राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी जर एखादे वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील, दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीस यांना दुःख वाटण्याचे कारण काय? असा सवाल महेश तपासे (mahesh tapase) यांनी केला आहे.

१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे.देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवार साहेब यांच्या संदर्भामध्ये काही ट्विट केले आहेत. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय पवारसाहेब जातीवादी आहेत, असा देवेंद्र फडणवीस यांचा एकंदरीत सूर होता. मात्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ पाहता आता पक्षाला जातीवादी घोषित करणे एवढेच भाजपकडून बाकी होते आणि त्याची सुरुवात भाजपचा नवीन फ्रंटमॅन राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केली आहे. असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली.

गेल्या ५०-५५ वर्षात देशाचे नेते शरद पवार यांनी समाजातल्या मागासलेल्या, अशिक्षित, दुर्बल अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे सकारात्मक काम केले आहे. आणि हे करत असताना त्यांनी जात आणि धर्म कधीच पाहिले नाहीत.घटना समितीचे प्रमख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील आरक्षणा संदर्भात समान संधी आणि मागासलेल्या समाजाच्या मागण्या या दोन गोष्टी सांगितल्या होत्या. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांच्या अवतीभवती एक राष्ट्रीय व्यापक पॉलिटिकल अजेंडा २०१९च्या निवडणुकीसाठी भाजपकडून निर्माण करण्यात येत होता. महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान पवारसाहेबांनी ३७० पेक्षा शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी हे महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचे आहे, असे विधान केले होते. त्या गोष्टीचा विपर्यास करून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपले ट्विट केले आहे. असे महेश तपासे यांनी म्हटले आहे.

तसेच जस्टीस राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेत मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकरिता एक उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आणि त्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा असे जर पवारसाहेबांनी म्हटले तर त्यात गैर काय? मंडल आयोगाची स्थापना जनता पार्टीचे तत्कालीन देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केली होती, हे देवेंद्र फडणवीस विसरले का? आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे फडणवीस यांना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात पण हरकत आहे का? असा सवाल महेश तपासे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

जेम्स लेन प्रकरण: पवारांनी पुराव्यासह राज ठाकरेंची केली पोलखोल