🕒 1 min read
Supriya Sule | मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजप यांचे सरकार आले आहे. आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वार पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सत्ता गेली याचे नैराश्य जास्त नाही कारण आदरणीय शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीचा ५५ वर्षांचा इतिहास पाहिला तर यातील २५ वर्षे ही सत्तेत होती आणि ३० वर्षे ही विरोधात होती. त्यातही प्रसिद्धी ही विरोधी पक्षात असताना अधिक झाली आहे. महाराष्ट्राने पवार साहेबांना विरोधात असतानाही प्रेम दिलं आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
‘२०१४ साली लोकांनी नापसंती दर्शवली आणि आपण हरलो. अनेक लोक आपल्याला सोडून गेले. सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये १०५ पैकी ५० त्यांचे आहेत आणि बाकी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील आहेत. त्यामुळे त्यांची ताकद खूप वाढली आहे असे नाही. एका सर्वेक्षणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १२ आणि काँग्रेस पक्षाला ८ अशा मिळून २० जागा मिळणार होत्या. मात्र साहेबांनी २०१९ च्या निवडणुकीत आपल्या भाषणाची शैली बदलली आणि ही संख्या ५४ वर गेली. संपूर्ण महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे उभा राहिला. राज्यातील युवकाने साहेबांवर विश्वास ठेवला’, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘आता सत्ता गेल्यानंतर पवार साहेबांना विचारलं पुढे काय तर ते म्हणाले की उद्यापासून मी गाडी काढणार आणि राज्यातील शेवटच्या युवकापर्यंत जाणार आणि पक्षाला पुन्हा उभारी देणार. आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचे हे पवार साहेबांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले त्यावरून २०१९ ची परिस्थिती आजही आहे असे वाटत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.’अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची बाजू मांडली.
‘शून्यातून पुन्हा उभे राहू आणि पूर्ण ताकदीने पक्ष संघटना उभी करू. कितीही मोठी ताकद आली तरी महाराष्ट्र नेस्तनाबूत होऊ शकणार नाही असा विश्वास व्यक्त करत मंत्रिपद असताना आपल्या पक्षाच्या प्रत्येक नेत्याने प्रामाणिकपणे अभिमानास्पद काम केले असल्याचे त्या म्हणाल्या. पक्षाची पुढील निवडणुकीत एकहाती सत्ता येऊ शकते पण राष्ट्रवादीचा विरोधक हा पक्षांतर्गत गटबाजी हाच आहे. त्यामुळे अजितदादा आणि जयंत पाटील यांनी मिळून राज्याचा दौरा करावा, अशी विनंती सुप्रियाताईंनी केली. याद्वारे पक्षाची एकहाती सत्ता येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही आणि २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष होईल, अशी खात्री सुप्रिया सुळे यावेळी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
