मुंबई : महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवर जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातून सहा राज्यसभेच्या जागा निवडून येतात. परंतु सहाव्या जागेसाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने, मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना सहाव्या जागेसाठी ठाम आहे. सर्व पक्षांच्या सहकार्याशिवाय संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेची वाट बिकट आहे. उमेदवारीसाठी शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट ठेवली होती. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापुराचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं शिवसेनेने जवळपास निश्चित केलं आहे.आता यावर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी फेसबूक पोस्ट लिहून खेद व्यक्त केले आहे.
विनोद पाटील यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “आताच काही चॅनलवर बातमी पाहिली की शिवसेना पक्षाने संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी दिली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. शिवसेनेने गादीचा सन्मान करायला हवा होता. राजे स्वतःहुन आपल्याकडे आले होते. त्यांचा सन्मान झाला नाही हे अत्यंत वाईट आहे. निवडणूकिसाठी रणनीती असते. राजे यांना ज्यांनी फसवलं त्यांची घरे त्यांनी आम्हाला दाखवावीत. कोणीतरी या मध्ये निश्चित मध्यस्थी असणार आहे आता राजे यांनी त्यांची नावे समोर आणावीत. देशात कोल्हापूर आणि सातारा या दोन गादी महत्वपूर्ण आहेत, त्यामुळे तरी शिवसेना सन्मान करेल असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही”
आता शिवसेनेकडून संभाजीराजे यांचा पत्ता कट झाला आहे, जवळपास निश्चित आहे. दरम्यान संजय राऊत यांनी म्हंटले आहे की,” छत्रपती घराण्याचा मान ठेवून आम्ही संभाजीराजेंना शिवसेनेची उमेदवारी देत होतो. परंतु राजेंनी शिवसेनेची उमेदवारी नाकारली आहे.”