🕒 1 min read
मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत तिसरा टी-२० सामना भारतासाठी ‘करो या मरो’सारखा आहे. भारतीय संघ हरला तर पाहुणा संघ मालिका जिंकेलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना आता १४ जूनला होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाईल.
विशाखापट्टणमच्या या स्टेडियमवर भारतीय संघाने आतापर्यंत ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २०१२ साली भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सामना नाणेफेक न होता रद्द करावा लागला होता. तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला होता. १४ फेब्रुवारीला झालेल्या त्या सामन्यात भारताने अप्रतिम कामगिरी करत ९ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात फिरकीपटूंनी शानदार खेळ दाखवला आणि श्रीलंकेच्या संघाचा डाव ८२ धावांत आटोपला होता.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे श्रीलंका विरुद्धच्या मालिकेतील तिसरा टी-२० सामना खेळला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. श्रीलंकेने १८ षटके खेळली आणि संपूर्ण संघ ८२ धावांत सर्वबाद झाला. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ८ धावांत २ बळी घेतले, तर सुरेश रैनाने २ षटकांत ६ धावा देत २ बळी घेतले. त्यानंतर शिखर धवनने नाबाद ४६ धावा करत भारतीय संघाला ९ गडी राखून विजय मिळवून दिला.
त्यानंतर २०१९ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामना याच मैदानावर खेळवण्यात आला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ३ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात केएल राहुलच्या (५०) अर्धशतकामुळे भारताने २० षटकांत ७ बाद १२६ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर-नाईलने ३ तर जेसन बेहरेनडॉर्फ, अॅडम झाम्पा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी १-१ बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियाने १२७ धावांचे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर ७ गडी गमावून पूर्ण केले होते. ग्लेन मॅक्सवेलने ४३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी करत १६ धावांत ३ बळी घेतले होते. त्याचवेळी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कृणाल पांड्याने १-१ गडी बाद केला होता. या सामन्यात कुल्टर-नाईलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
