🕒 1 min read
नवी दिल्ली : लष्करातील सैन्यभरतीबाबतच्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) आता देशभरातून विरोध होत आहे. या योजनेवरून देशात सर्वत्र गदारोळ सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी सैन्य भरतीच अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. एका राज्याचे पडसाद दुसऱ्या राज्यातही उमटत आहेत. देशाच्या विविध भागात विद्यार्थ्यांकडून निदर्शने होत आहेत. आता अग्निपथ योजनेबाबत विरोधी पक्षांकडूनही विरोध केला जात आहे. यावर काँग्रेसने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आहे.
काँग्रेस नेते प्रमोद तिवारी (Pramod Tiwari), पवन खेरा (Pawan khera) आणि युवा नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी मोदी सरकारच्या येऊ घातलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेवर टीका केली आहे. अग्निपथ ही योजना नोटाबंदीसारखा कुचकामी निर्णय आहे. कसलाही विचार न करता धोरणे बनवून पंतप्रधान जनतेसोबत खेळत आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले. तसेच, मोदी सरकारने अग्निपथ ही योजना तातडीने मागे घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी अग्निपथ योजनेचे वर्णन “नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन बिना डायरेक्शन” असे केले आहे. तसेच आर्थिक बचतीसाठी देशातल्या तरुणांना शहीद करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे. याशिवाय, आपला हक्कासाठी झगडणाऱ्या तरुणांवर लाठीमार केला जात आहे. ही योजना मागे घ्या. अखेर, किती तरुणांच्या हौतात्म्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे? असाही सवाल प्रमोद तिवारी यांनी केला.
बिहारमधील बेरोजगारीचा दर हा दुप्पट आहे. तरुणांकडून संधी हिसकावून घेतल्या जात आहेत, पंतप्रधान आम्हा लोकांना पिंजऱ्यात ठेवलेले उंदीर समजतात. हा देश गांधींचा देश आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात लष्कर भरतीच्या आंदोलनाला काँग्रेस पाठिंबा देत आहे, असे कन्हैया कुमार म्हणाले. तसेच कन्हैया कुमार यांनी तरुणांना हिंसा आणि जाळपोळ करू नका, असे आवाहनही केले आहे. सरकारने ही योजना लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
