🕒 1 min read
मुंबई: गान सरस्वती स्वगृही म्हणजेच स्वर्गलोकी परतली आहे. लता मंगेशकरांच्या स्वर्गारोहणाने पृथ्वी अश्रूंनी भिजली आहे. स्वरलतेचे रविवारी सकाळी लोकार्थानि निधन झाले, परंतु आमचेच काय, सारे जग ती बातमी स्वीकारायला तयार नाही. लता मंगेशकर यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले, तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे व त्या लवकरच प्रभुकुंजवर परत येतील, असा विश्वास होता. देशभरात त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू होत्या, पण लता इस्पितळातून थेट प्रभूघरी निघून गेल्या. प्रभुकुंज तर सुने झालेच, पण अखंड 70 वर्षे सुरू असलेली देशातील संगीत मैफलही सुनी सुनी झाली आहे. अशा भावना शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून व्यक्त केल्या आहेत.
लतादीदींच्या जाण्याने संगीत युगाचा एकापरीने पूर्णास्त झाला आहे. सुरावटी निर्माण होतील, गाणे निर्माण होईल, पण नादमयी सुरांचा झंकार कायमचा संपला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने गंगा-यमुना, गोदावरी, झेलमचा प्रवाहही थांबला आहे. हिमालयही दु:खाने वितळून गेला आहे आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा कडा वेदनेने अस्वस्थ झाला आहे. लतादीदींचे वय 92 वर्षे होते. त्या परिपूर्ण जीवन जगल्या. त्या वृद्धापकाळाने स्वर्गस्थ झाल्या असे कसे म्हणायचे? त्यांचा स्वर, त्यांचे मन, त्यांचे वावरणे, संवाद शेवटच्या श्वासापर्यंत तरुणच होता.
गेली 75 वर्षे लता मंगेशकर नावाचा चमत्कार आपल्या जीवनाचा भाग बनला होता, हे किती मोठे भाग्य! मास्टर दीनानाथ यांची ही ज्येष्ठ कन्या 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्माला आली, तेव्हा दीनानाथांचा मुक्काम इंदूरमध्ये होता. दीनानाथ मंगेशकरांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा लतादीदी अवघ्या तेरा वर्षाच्या होत्या. मास्टर विनायक यांनी मंगेशकर भावंडांची काळजी घेतली. लतास गायिका आणि अभिनेत्री म्हणून पुढे आणले. 1942 साली ‘किती हसाल’ या चित्रपटासाठी लतादीदी पहिल्यांदा गायल्या तेव्हापासून त्यांच्या सुरांची बरसात अखंड सुरूच राहिली.
संगीतकार गुलाम हैदर यांचा तेव्हा दबदबा होता. त्यांच्याकडे गाण्याची संधी मिळणे म्हणजे गायकाच्या दृष्टीने त्या काळचा सर्वोच्च सन्मान होता. रेकॉर्डिंगचे तंत्र तेव्हा आजच्याइतके प्रगत नव्हते, खय्याम सांगतात, ‘मजबूर’ सिनेमातील ‘पिया मिलने को आ’ या गाण्याच्या वेळी एक मुलगी अगदी सहज गाताना दिसत होती. हृदयाच्या तळाचा ठाव घेणारा होता. रेकॉर्डिंग संपल्यावर खय्याम यांनी प्रश्न विचारला, ‘मघाशी गाणारी ती मुलगी कोण होती?’ हैदर साहेबांनी तिचे नाव सांगितले, ‘लता मंगेशकर.’ हैदर यांनी त्याच वेळी भविष्यवाणी उच्चारली. ‘अगर उसका दिमाग बॅलन्स रहा तो वो आसमाँ छू जायेगी.’ मास्टरजींची भविष्यवाणी खरी ठरली. मंगेशकर यांना सांगितले, “बेटा, गाना शुरू करो.” लतादिदींनी गाणे सुरु केले.
लतादीदी लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोहचल्या.हे शिखर गेल्या दहा हजार वर्षात कुणालाच गाठता आले नाही. लताचे गाणे हे साऱ्या आसमंताचे जगणे झाले. लता मंगेशकर या हिंदुस्थानी सिनेसृष्टीच्या ‘गानसम्राज्ञी’च ठरल्या. लतादीदी आज इंद्राच्या दरबारी विशेष सिंहासनावर रुजू होण्यासाठी गेल्या, पण या भूतलावरील त्यांचे सूर-स्वरांचे सम्राज्ञीपद कायम राहील. सूर्य-चंद्र असेपर्यंत ते राहील. सूर्य मावळू द्या, चंद्र अस्ताला जाऊ द्या, पण लतादीदींचे सूर कायमच राहतील. त्यांच्या जीवनाचा प्रवास आज संपला, पण गाण्याचा, सुरांचा प्रवास कसा संपेल? गंगा-यमुनेप्रमाणे तो वाहतच राहील.
महत्वाच्या बातम्या:
- युपीत सेना ५० ठिकाणी उमेदवार देणार; संजय राऊतांची घोषणा
- “तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद”; शिखर धवनने केली भावनिक पोस्ट
- गेंड्याच्या कातडीचे सरकार! वीस वर्षापासून संघर्ष करणाऱ्या साळूंके कुटुंबाला न्याय मिळणार ?
- अल्लू अर्जूनने ट्विटरवर रजनीकांतलाही टाकलं मागं, नेटकरी म्हणाले खरोखर फायर आहेस
- “नाहीतर महाराष्ट्रातील निम्मे साखर कारखाने बंद झाले असते…”; नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
