बीड : न्याय फक्त श्रीमंताना मिळतो. गरिबांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतात पण त्यांना न्याय मिळत नाही, अशीच एक मन हेलावून सोडणारी घटना समोर आली आहे. गेंड्याच्या कातडीच्या सरकारला याची जराशी किव देखील आली नाही. बीड येथे २६ जानेवारीपासून तारामती साळूंके ही महिला स्मशानात एकटी आंदोलनाला बसली आहे. तिच्या आंदोलनाचे दहा दिवस उलटून गेले तरी तिच्याकडे पहायला व तिची दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही. खरेतर तिची व्यथा आणि कथा अंगावर काटा आणणारी आहे. गेल्या वीस वर्षापासून ती व तिचे कुटूंब न्यायासाठी संघर्ष करत आहेत. न्यायासाठी झगडणाऱ्या तारामती साळूंकेने आपला पती गमावला, आपली सासू गमावली तरी पदरात न्याय पडला नाही.
तारामती यांच्या परिवारातील यापुर्वी दोन माणसांचा न्याय मागता मागता मृत्यू झाला पण सरकारला जाग आली नाही. सासूने देखील न्यायासाठी मंत्रालयात हेलपाटे मारले मात्र मुंबईत जाताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. पण त्यांना न्याय मिळाला नाही. त्यानंतर तारामती यांचे पती अर्जून साळूंके यांनी देखील न्यायासाठी संघर्ष केला. मात्र त्यांचीही दखल कोणी घेतली नाही शेवटी त्यांनी पाटबंधारे कार्यालयात स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्याचाही अंत झाला. आता त्यांची पत्नी तारामती न्यायासाठी लढा देत आहे.
काय आहे प्रकरण?
तारामतीच्या कुटूंबाची वीस वर्षापुर्वी राज्याच्या पाटबंधारे खात्याने जमीन संपादित केली आहे. बीड जिल्ह्यातील पाली या गावचे हे कुटूंब आहे. वीस वर्षापासून शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मागत आहेत. मात्र तो आजपर्यंत मिळाला नाही. त्यांना फक्त हेलपाटे मारावे लागत आहेत. पाटबंधारे विभाग त्यांना कोलण्याचे काम करत आहे. या वीस वर्षात तारामतीच्या सासूने मंत्रालयात कित्येक हेलपाटे मारले. कायदेशीर लढाई लढली. निकालही त्यांच्यासारखाच लागला. त्यांना मदत देण्याचे आदेश झाले पण पदरात फुटकी कवडी मिळाली नाही. संपादित जमिनीचे पैसे मिळावेत म्हणून मंत्रालयात चकरा मारणाऱ्या म्हातारीचा अखेर अपघातात मुंबईतच जीव गेला. आई मेल्यावर लेकाने हक्काचा संघर्ष चालू ठेवला. त्यालाही प्रशासन जुमानले नाही. अखेर त्या संवेदनशील माणसाने फरफट सहन न झाल्याने २४ नोव्हेंबर २०२० रोजी बीड च्या पाटबंधारे खात्याच्या कार्यालयातच पेटवून घेतले. त्यात त्याचा होरपळून मृत्यू झाला. आता त्याची बायको संघर्षाच्या मैदानात उतरली आहे. उतरताना ती स्मशानातच आंदोलनाला बसली आहे. तिच्या घरातली दोन कर्ती माणसं शासनाने व प्रशासनाने स्मशानात घालवली आहेत. आता तिलाही हे सरकार आणि प्रशासन यमसदनी धाडणार का ? हा संवेदनशील लोकांना पडलेला प्रश्न आहे.
हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे की बिहार-उत्तरप्रदेश?
या प्रकरणावर स्थानिक वृत्तपत्राचे संपादक दत्तकुमार खंडागळे म्हणाले, “सामान्य माणसाला त्याचा हक्क मिळवण्यासाठी मरावे लागत असेल तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. या सरकारला लाज-शरम असेल तर या तारामतीला न्याय द्यावा. तिच्या हक्काचा मोबदला तिला द्यावा. बीडच्या माऊलीची ही कहाणी काळीज पिळवटून टाकणारी आहे. प्रशासनाला आणि शासनाला ह्रदय नाही. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी “रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावला तर याद राखा, त्याच्या बांधावरचे वाळलेले झाड तोडले तरी त्याचा मोबदला द्या, ते तोडण्याआधी त्याची परवानगी घ्या !” असे आदेश सैन्याला दिले होते. त्याच मातीत ही हरामखोरी होते आहे. शेतक-यांची जमीन ताब्यात घेतात, त्याचा मोबदलाही त्याला देत नाहीत. बदल्यात त्या कुटूंबातल्या दोन दोन लोकांचे जीव घेतले जातात. हा प्रकार मन विषण्ण करणारा आहे. न्यायावरचा आणि कायद्यावरचा विश्वास उडालेल्या या कुटूंबातल्या एखाद्या पोरट्याने उद्या एखाद्या अधिकाऱ्याच्या छाताडात बंदूक मोकळी केली तर? त्याला नक्षलवादी म्हणायचे की दहशतवादी? बीडची ही घटना पाहून हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे की बिहार-उत्तरप्रदेश आहे ? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.”
महत्वाच्या बातम्या :
- “…मगच निर्बंध शिथिलतेसंदर्भात निर्णय घेणार”, अजित पवारांचे स्पष्टीकरण
- “ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला”, आरोपींची पोलिसांसमोर कबुली
- सचिन तेंडुलकरने केले भारतीय क्रिकेट बद्दल एक मोठे वक्तव्य …
- राज्यात सध्या महाविकास आघाडीचे नव्हे तर टोळी सरकार आहे- चंद्रकांत पाटील
- बिग बॉस फेम तेजस्वी करण कुंद्राशी लग्नासंदर्भात म्हणाली, “तो उमर रियाजसोबत…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

