पुणे : आज पुण्यात माध्यमांशी शरद पवार यांनी संवाद साधला. “सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांपूर्वीच काही लोकांनी ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ होत असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
पुढे शरद पवार यांना भाजप नेत्यांची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीविषयी प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार म्हणाले, सगळेच माझ्यासारखे नसतात. माझी सत्ता कित्येकदा गेली आहे. १९८० साली माझे सरकार बरखास्त झाले. रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी मला ही बातमी दिली. त्यानंतर मी तीन-चार लोकांना बोलावून घरातील सामान आवरले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. सरकारची गादी सोडली. त्यादिवशी मुंबईत इंग्लंड आणि भारत यांची क्रिकेट मॅच होती. ती मॅच पाहण्यासाठी मी सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडिअमवर गेलो आणि दिवसभर मॅच पाहण्याचा आनंद लुटला. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे आपण इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही”.
यावेळी शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “हल्ली सत्ता गेल्यामुळे लोक खूप अस्वस्थ होतात. मी त्यांना दोष देणार नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वी ‘मी येणार, मी येणार’, अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. पण तसे घडू शकले नाही. त्यामुळे ते अस्वस्थ असावेत. आपण अपेक्षा करूयात की, आमच्या स्नेह्यांना या सगळ्या परिस्थितीमधून काय निर्माण होते, हे लक्षात येईल आणि इथे योग्य वातावरण निर्माण करण्यास त्यांचे सहकार्य मिळेल”, असे शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


