पुणे : महाराष्ट्र राज्यसभेसाठी 6 जागांसाठी झालेल्या रंजक लढतीत भाजपने 3 तर महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत भाजपने डॉ.अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीच्या निकालात हे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर भाजपच्या नेत्यांनी विधानभवनातच जल्लोष करत गुलाल उधळून आपला विजय साजरा केला. दुसरीकडे काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार रिंगणात होते. संजय पवार वगळता महाविकास आघाडीचे उर्वरित तीन उमेदवार विजयी झाले.
या निकालानंतर महाविकास आघाडीवर विरोधक टीका करत आहेत. या टीकाकारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी सवाल केला आहे. “महाविकास आघाडीला घोडे बाजार करतात असे म्हणाऱ्या भाजपने अपक्ष आमदारांना कोणता चारा दिला तेही सांगावे. दुसऱ्याला शिकवावे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण, आणि हो राज्यसभा जिंकून ईडी, सीबीआय रडीचा डाव रडून मुख्यमंत्री नाहीच ना. केंद्रातील सत्तेचा कितीही गैरवापर करा. महाविकास आघाडीची मते फुटली नाहीत”, असे रुपाली पाटील म्हणाल्या.
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. साधारणत: राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच बहुतांश उमेदवार बिनविरोध विजयी होतात. पण इथे एक आव्हान होतं. ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होती. मात्र थेट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना विजयाची स्वप्ने पाहत राहिली आणि फडणवीस यांनी रणनीतीच्या क्षेत्रात स्वत:ला ‘सिद्ध’ केले. रात्री उशिरापर्यंतच्या गदारोळानंतर निकाल येताच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. तीन मोठ्या पक्षांची युती करून सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांनी परावभ पचवाव लागला.
महत्वाच्या बातम्या :


