🕒 1 min read
मुंबई : हॉटेलमध्ये पार्टी केल्यानंतर बिल न दिल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोतांचा ताफा अडवण्यात आला होता. सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता असा अजब प्रकार घडला. या मालकाने सदाभाऊ खोतांच्या ताफ्यासमोर मोठा गोंधळ घातला होता. सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे. या प्रकारानंतर सदाभाऊ खोत यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याची टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंना खोचक टोला लगावला आहे.
“पोट फुटेस्तोवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हॉटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण होतोय, अशी सगळीकडे चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तवर आंदोलन करा, आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा”, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
“ह्या घटनेमागची सत्यता पडताळता डोळ्यासमोर जे आलं ते मात्र अवस्थ राजकीय वातावरणातून कुणीतरी केलेलं षडयंत्र असल्याचं उघड झालं. ह्या प्रकरणात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या टोमॅटो सारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून या हॉटेल मालकाने बनाव केला, असे खोत म्हणाले.
“३/४/२०२१ रोजी लिमिटेशन ऍक्ट खाली हॉटेल मालकावर एक गुन्हा दाखल आहे. महाकाली सहकारी साखर कारखाना कवठे महाकाळ चा IPC १३८ खाली गुन्हा दाखल आहे. जयहिंद पतसंस्थेचा IPC १३८ खाली गुन्हा दाखल आहे. असे तब्बल सहा सात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो वाळूमाफिया आहे. तो दारूविक्रेता आहे, ही सगळी माहिती समोर आली. हा राष्ट्रवादीचा भामट्या एवढयावरच थांबला नसून त्याने सिद्धू शिंदे, रा. काळेवाडी, ता आटपाडी, जि. सांगली यांच्या बँगलोर येथील सोन्याच्या दुकानातून १४ किलो सोने चोरल्या बद्दल देखील गुन्हा नोंद आहे.”
“पोलिसांनी या व्यक्तीची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून त्यावर तात्काळ कारवाई करावी. परंतु पोलीस देखील गुन्हा नोंद करायला तयार नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे, हे लक्षात आले. राष्ट्रवादीकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
“तुम्ही असे हल्ले करून आणि कुभांड रचून आम्हाला जीवनातून उठवू शकत नाही. हा संघर्ष आता तीव्र होईल आणि गावगाड्यातील माणसांना एकत्र घेऊन ह्याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गुन्हेगारांना पुढे घालून जर हल्ला कराल तर सदाभाऊ खोत त्याच्या बापांचा बाप आहे. भविष्यात ‘आरे ला कारे’ म्हणूनच उत्तर दिले जाईल,” असा इशारा देखील सदाभाऊंनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
