मुंबई : मागच्या १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात अस्थिरता निर्माण झाली होती. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडले. अखेर १५ दिवसांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे आपल्या मतदार संघात परत गेले आहेत. यावेळी जनतेनं त्यांचं जंगी स्वागत केलं आहे.
“आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते.” असे आरोप बंडखोर नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून केले होते. असेच गंभीर आरोप बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांनी देखील केले आहेत.
बंडखोरी का केली? याचं उत्तर देताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलं की, “गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ‘माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा’, आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. बंडखोरी का घडली याबाबत एकनाथ शिंदे यांनी काल टीव्हीच्या माध्यमातून सर्व सांगितलं आहे. त्यामुळे मी आता अधिक बोलणार नाही.”
“पण मी एवढंच सांगू इच्छितो की, एकाच वेळी ५० आमदार पक्षातून निघून जातात, ही गोष्ट समजण्यासारखी आहे. यासाठी मी उद्धव ठाकरेंना दोष देणार नाही, परंतु उद्धव साहेबांच्या आजूबाजूला जे चार बडवे आहेत, त्यांना दोष देणार आहे. त्यांनीच आमच्यासारख्यांना बाजूला काढण्याचं काम केलंय,” असे गंभीर आरोप बोरणारे यांनी केले आहेत.
पुढे बोलताना रमेश बोरणार म्हणाले की, “एकनाथ शिंदे साहेबांनी कालच सांगितलंय की, बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. आम्ही त्या घराण्याला कधीही विसरू शकत नाहीत. आम्ही बंडखोरी केली नाही, आम्ही उठाव केला आहे. असं देखील बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांनी स्पष्ट केलं. अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याचा कानमंत्र आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिला आहे. मी तालुक्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. वैजापूर तालुक्यात जे पाच प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्याचं काम मी करणार आहे. माझ्याकडून जर काही चुकीच झालं असेल तर २०२४ ला जनता मला माफ करणार नाही. पण जर मी विकासाच्या बाजूने गेलो असेल, तर जनता मला नक्की पुन्हा संधी देईल,” असंही बोरणारे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

