मुंबई : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारचं कौतुक केलं आहे. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे आणि या सरकारकडून चांगली काम येत्या काळात होतील असा विश्वास देखील आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला असल्याचा खुलासा बच्चू कडू यांनी यावेळी केला. “राष्ट्रवादीकडून मतदार संघात निधी मिळत नव्हता. शेवटी जनतेची काम करत असताना तुम्ही मंत्री असला तरी तुमचा मतदार संघ तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो” असे देखील बच्चू कडू यावेळी म्हणाले.
“शिंदे आणि फडणवीस फेविकॉल पेक्षा मजबूत जोड आहे. सरकार कोसळणार असं सांगणं हे विरोधकाचं कामच असतं. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही” असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. यावेळी मुलाखतीत त्यांना मंत्रिपदाबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले , मंत्रीपदापेक्षा मतदार संघातील विकास महत्त्वाचा असतो. तसेच माझ्यासाठी दिव्यांगांचा विषय महत्त्वाचा आहे.
कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे मी लक्ष देत नाही. दिव्यांगांसाठी वेगळा विभाग बनवून त्याचा चार्ज जर माझ्याकडे दिला तर नक्कीच त्यासाठी चांगलं काम करता येईल. अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांचे देखील यावेळी कौतुक केलं. “एकनाथ शिंदे किंतु परंतु न ठेवता प्रेम करणारा माणूस आहे” असंही यावेळी ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

