🕒 1 min read
अहमदनगर : सध्या धार्मिक स्थळावरील भोंग्यांवर वाद सुरु आहे. या मुद्यांवरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटलेले असताना पाहायला मिळत आहे. आज सकाळी काही मशिदींवर भोंगा न वाजता नमाज पठण झाले. मनसेही मशिदींवरील भोंगा हटवण्यासाठी अधिक आक्रमक झालेली आहे. या पाश्वर्भूमीवरून शिर्डीतील साईबाबा संस्थानाबाबतही एक महत्वपूर्ण माहितीही समोर येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी महत्वाची माहिती सांगितलेली आहे.
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मंदिरात पहाटे होणारी काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीच्यावेळी मंदिरावरील स्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी काकड आरती आणि शेजारतीच्यावेळी स्पीकर बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साई मंदिरासह सर्वच धार्मिक स्थळांनी पहाटे आणि रात्री भोंगे न लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. शिर्डीच्या मंदिरावर पहाटे आणि रात्री भोंगे लागणार नाहीत अशाही सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. शिर्डी हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. येथील आरत्यांच्या स्पीकरवर कोणी कधीही हरकत घेतली नव्हती. आता मात्र महत्वाच्या आरत्यांच्यावेळी स्पीकर बंद राहणार असल्याने त्या मंदिर परिसरात आणि शहरातही ऐकता येणार नाहीत. दुपारची आरती आणि सूर्यास्ताच्या वेळची धुपारती यावेळी मात्र स्पीकर सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.
राज ठाकरे यांच्या भोंगेविरोधी भूमिकेवर संजय राऊतांची टीका –
संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंगेविरोधी भूमिकेवर सडकून टीका केली. म्हणाले, “मनसेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भाजपने महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय, मग ते कोणतेही भोंगे असोत तो निर्णय २००५ चा आहे. भाजपने मनसे सारख्या पक्षाला समोर करून हा विषय चर्चेत आणला. गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आज सकाळपासून मी पाहतोय, अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थस्थळं जसे की शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह अनेक ठिकाणी सकाळच्या काकड आरत्या लाऊडस्पीकरविना झाल्या. सकाळी मंदिरात खूप कमी लोकांना प्रवेश असतो. म्हणून या काकड आरतीसाठी पंचक्रोशीतील लोक त्याचा आनंद घेण्यासाठी जागे असतात, आसपास उभे असतात. आज भोंग्यांचा विषय पुढे आल्यामुळे या संपूर्ण देवस्थानावर भोंगे लागले नाही आणि लाखो भाविकांची गैरसोय झाली, त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
