🕒 1 min read
मुंबई : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२१-२२च्या पहिल्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशने बंगाल संघाचा १७४ धावांनी पराभव केला. मध्य प्रदेशचा संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी १९९९मध्ये मध्य प्रदेश संघाने कर्नाटकविरुद्ध एकमेव अंतिम सामना खेळला होता. बंगालला चौथ्या डावात विजयासाठी ३५० धावांचे लक्ष्य मिळाले होते. पाचव्या दिवशी बंगालचा संपूर्ण संघ अवघ्या १७५ धावांवर गारद झाला. मध्य प्रदेशसाठी पहिल्या डावात १६५ धावा करणारा सलामीवीर हिमांशू मंत्रीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
मंत्रीचे शतक आणि अक्षत रघुवंशीच्या शानदार ६३ धावांच्या जोरावर मध्य प्रदेशने पहिल्या डावात ३४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगालच्या मनोज तिवारी (१०२) आणि शाहबाज अहमद (११६) यांनी शतके झळकावूनही २७२ धावा करता आल्या. पहिल्या डावाच्या जोरावर मध्य प्रदेशला ६९ धावांची आघाडी मिळाली. मध्य प्रदेशला दुसऱ्या डावात कर्णधार आदित्य श्रीवास्तव (८२) आणि रजत पाटीदार (७९) यांची साथ लाभली. या दोन्ही खेळाडूंच्या अर्धशतकांमुळे मध्य प्रदेशला २८१ धावा करता आल्या.
बंगालच्या दुसऱ्या डावात कर्णधार अभिमन्यू इसवरनने १५७ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला मोठ्या डावात खेळण्यात अपयश आले नाही. पहिल्या डावातील शतकवीर शाहबाज अहमदने दुसऱ्या डावातही नाबाद २२ धावांची भर घातली, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. शाहबाज अहमदने या सामन्यात केवळ फलंदाजीत नव्हे तर गोलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात पाच बळी घेतले.
बंगालचा पराभव करण्यात मध्य प्रदेशचा डावखुरा चायनामन गोलंदाज कुमार कार्तिकेयचा मोठा वाटा होता. त्याने पहिल्या डावात ६१ धावांत तीन बळी घेतले. त्याचवेळी दुसऱ्या डावात ६७ धावांत पाच विकेट्स घेतल्या. २४ वर्षीय कार्तिकेय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे. आता रणजीचा अंतिम सामना २२ जुनपासून मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळवण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
