देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज देहू नगरीत आगमन झाले होते. मोदींच्या हस्ते आज देहुमध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम देहू संस्थानचा असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधिंना निमंत्रित केले नसल्यामुळे त्यावरुन आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधानांच्या आजच्या देहू येथील कार्यक्रमात मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना निमंत्रण नव्हते. या दोघांच्याही मतदारसंघात हा कार्यक्रम पार पडला होता. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
याबाबत श्रीरंग बारणे म्हणाले, “मी संत तुकाराम महाराजांचा भक्त आहे. पदावर नसल्यापासून मी वारीत सहभागी होत आहे. या कार्यक्रमाला मला जायला आवडले असते. हा देहू संस्थानचा कार्यक्रम होता. पण भाजपने तो कार्यक्रम आयोजित केला आहे, असे चित्र निर्माण झाले. यामध्ये पक्षीय राजकारण करणे योग्य नव्हते. या कार्यक्रमापासून स्थानिक प्रतिनिधींना दूर ठेवणे योग्य नव्हते. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असूनही निमंत्रण नसल्याने मला जाता आले नाही. माझी कोणावरही नाराजी नाही, पण भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केला”
यावेळी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी भाजपचे माजी राज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना या कार्यक्रमाच्या नियोजनाचे श्रेय आपल्या प्रास्ताविकात दिले होते.
यावेळी व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी, “आजचा क्षण अभिमानाचा आहे, कारण देशाचे नाहीतर अखिल विश्वाचे लोकप्रिय पंतप्रधान येथे आले आहे. त्यांचं मी स्वागत करतो, अशा शब्दांत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. यानंतर अजित पवार भाषण करतील असे वाटत असतानाच पंतप्रधान मोदी भाषण करण्यास उठले. यामुळे उपमुख्यमंत्री असूनही अजित पवारांना बोलण्याची संधी दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर समारोपावेळी देखील अजित पवारांचे भाषण न झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

