देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज देहूनगरीत येथे आगमन झाले होते. यावेळी त्यांचे विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जगदीश मुळीक यांच्याकडून मोदींचे स्वागत करण्यात आले. यानंतर मोदींनी संत तुकोबारायांचे दर्शन घेऊन शिळा मंदिराचे लोकार्पण केले. मोदींनी यावेळी भाषण केले. त्याआधी फडणवीस यांनीही भाषण केले, मात्र भाषणावेळी अजित पवार यांना बोलण्याची संधीच दिली नाही. उपमुख्यमंत्र्यांनाच भाषण करण्यापासून डावलल्याने आता राजकीय वाद रंगणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावेळी व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी, “आजचा क्षण अभिमानाचा आहे, कारण देशाचे नाहीतर अखिल विश्वाचे लोकप्रिय पंतप्रधान येथे आले आहे. त्यांचं मी स्वागत करतो, अशा शब्दांत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. यानंतर अजित पवार भाषण करतील असे वाटत असतानाच पंतप्रधान मोदी भाषण करण्यास उठले. यामुळे उपमुख्यमंत्री असूनही अजित पवारांना बोलण्याची संधी दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर समारोपावेळी देखील अजित पवारांचे भाषण न झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
अजित पवारांना भाषणाची संधी न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशाही प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटू लागल्या आहेत, मात्र देहू संस्थानाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रोटॉकल नुसार प्रस्तावना तयार करण्यात आली होती. यानुसार अजित पवार यांच्या भाषणाचा उल्लेख कुठेही नव्हता असेही सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी भाषणामध्ये राज्यपाल यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली होती. त्याचमुळे अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नाही का असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

