नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील गरीब आणि मजुरांना मदत करण्याची मागणी केली. लॉकडाउनच्या या काळात देशातील गरीब आणि मजुरांच्या बँक खात्यात तत्काळ ७५०० रुपये जमा करावेत अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होत्या. या बरोबरच मजुरांना अन्न मिळावे यासाठी तत्काळ पावलं उचलण्याची गरज असल्याचेही सोनिया म्हणाल्या. या वेळी सोनिया गांधी यांनी करोनाशी लढाई लढणाऱ्या देशातील डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या बैठकीत सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दाही उचलला. देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे देशातील शेतकरी सर्वाधिक त्रस्त असल्याचे त्या म्हणाल्या. कमकुवत आणि अस्पष्ट खरेदी धोरणांव्यतिरिक्त पुरवठा साखळीमध्येही अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी त्रस्त झाल्याचे सोनिया म्हणाल्या. या समस्या लवकरात लवकर सो़डवल्या पाहिजेत. शिवाय खरीप पिकांसाठीही शेतकऱ्यांना सोयी-सुविधा मिळण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.
सरकारवर टीकास्त्र सोडताना देशात वापरात असलेल्या पीपीई किट्सची गुणवत्ता खराब असून देशात चाचण्याही कमी होत आहेत आणि हे अतिशय गंभीर आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. त्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होत्या.
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार,मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना सोनिया गांधी म्हणाल्या की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार चाचण्याबाबत आमचे मत कळवले आहे. चाचण्यांना कोणताही पर्याय नसून चाचण्यांची गती वाढवली पाहिजे. असे असतानाही देशात चाचण्या कमी होत आहेत. त्याच प्रमाणे पीपीईचा दर्जाही चांगला नाही. आम्ही बऱ्याच सूचना केलेल्या आहेत. परंतु, सरकार सूचनांची अंमलबजावणी कऱण्याबाबत उत्सुकता दाखवत नाहीये .
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

