मुंबई: ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय, अत्याचार केला. माझ्यावरील अन्यायाचं उत्तर महाराष्ट्रातील जनता ठाकरे सरकारला नक्की देईल. हनुमान चालिसा म्हणणं हा जर गुन्हा असेल तर १४ दिवसच काय, १४ वर्ष तुरुंगात राहायला तयार आहे. राम आणि हनुमानाचं ठाकरे सरकारला काहीही पडलेलं नाहीये. प्रभू राम आणि हनुमानाच्या नावावर ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केलाय. असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या पाश्वर्भूमीवर आता राणा दाम्पत्य यांनी दिल्लीची वाट पकडली आहे. दरम्यान संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात मी दिल्लीत एफआयआर दाखल करणार असल्याचा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला २० फूट खोल गाडण्याची धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात मी दिल्लीत एफआयआर दाखल करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याची तक्रार करणार आहे. महाराष्ट्रात पोलिसांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. पण तशी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता मी अमित शाह यांना भेटून केंद्रातूनच संजय राऊत यांच्यावर कारवाई करायला लावणार”, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. त्या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत यावेळी मुंबई विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. अजित पवार हेच मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त काम करतात. अजितदादांना आम्ही मानतो, त्यांना सुद्धा आमच्याबद्दल माहिती आहे. खार पोलीस ठाण्यात पोलिसांनी आम्हाला चहा पाजल्याचा उल्लेख करण्यात आला. पण अजितदादांनी तुरुंगात आमच्यासोबत काय झाले, याचीही माहिती घ्यावी, असे नवनीत राणा यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या –


