मुंबई : सध्या राज्यात चालू असलेल्या राजकीय सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. “गुवाहाटीतील आमदार जिवंत प्रेत आहेत. त्यांचे आत्मा मेले आहेत. ते परत आल्यावर त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी थेट विधानसभेत पाठवले जातील. इथं पेटलेल्या आगीत काय होऊ शकतं हे त्यांना माहीत आहे” अशी जहरी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर बरेच पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
“राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी मतदान केलं आणि महिनाभरानंतर तुम्ही आम्हाला प्रेत कसे म्हणू शकता? तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असं सडेतोड उत्तर दीपक केसरकर यांनी दिलं आहे. “अजून तुम्ही शपथ घेतलेली नाही, राजीनामा द्या. तुमच्याबरोबर काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागे राहिलेले काही शिवसैनिक आहेत. त्यांच्या मतांवर निवडून या. नंतर आमच्यावर टीका करा. नैतिक अधिकार पाहिजे काय बोलतायं तुम्ही” असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
बंडखोर आमदारांची मागणी असेल तर मी शिवसेनाप्रमुख पदही सोडायला तयार आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. या संदर्भात दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुखाबाबत आम्हाला कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पक्षप्रमुखांना कुणाचाही विरोध नाही किंवा कोणतेही मतभेद नाहीत. मात्र शिवसेनेने महाविकास आघाडी मधून बाहेर पडावं हीच सर्वांची इच्छा आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी दाखवली तरच सर्व आमदार परत येतील आणि त्यांच्या आशीर्वादाने सत्तेची समीकरणं बदलावीत हीच सर्वांची इच्छा आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली असून हे शेवटचं आवाहन असल्याचे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :


