कोल्हापूर (कागल) : प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय गुणाने सर्वच कलाप्रेमी लोकांची मनं जिंकली आहे. चित्रपट असो किंवा नाटक, हिंदी असो किंवा मराठी अश्या अनेक कार्यक्षेत्रात नाना पाटेकर यांच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजतो. नुकतंच नाना पाटेकर यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कागल येथे चार महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर आणि हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीची अनोखी गोष्ट उपस्थितांना ऐकण्यास मिळाली.
या कार्यक्रमासाठी नाना पाटेकर यांचा मुक्काम एका हॉटेलमध्ये करण्यात आला होता. हसन मुश्रीफ स्वत: नाना पाटेकर यांच्याकडे गेले. हसन मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच नाना पाटेकर हे खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांची गळाभेट घेतली.
यावेळी नाना पाटेकर मुश्रीफ यांना म्हणाले, ‘अरे तू इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो’.यावर मुश्रीफ म्हणाले, ‘असं कसं? पाहुण्यांचे स्वागत,आदरातिथ्य करणं हे आम्हा कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत’. यावर नाना म्हणाले, “हसन हा माझा जवळचा दोस्त आहे रे. उगाच गैरसमज करून घेऊ नका. काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्याने जात असलेला हसन मला दिसला. मी ‘हसन..हसन असे म्हणत निघालो. या घाईत मी माझी गाडी दुसऱ्याला धडकली होती”, असा एक किस्साही नानांनी सांगितला.
दरम्यान यावेळी नाना पाटेकर यांच्या हस्ते महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांचा अनावरण कार्यक्रम सोहळा पार पडला. भाषण देतेवेळी नाना पाटेकर म्हणाले, ‘फक्त महापुरुषांचे पुतळे उभारून चालणार नाही. त्यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे.’
“गेल्या २५ वर्षांपासून मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हटलं तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी आमच्यासारख्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत, असेही नाना पाटेकर म्हणाले.
भाषण करत असताना नाना पाटेकर यांनी मुश्रीफ यांना थेट अभिनय क्षेत्रात येण्यासाठी ऑफर दिली. तुम्ही अभिनय क्षेत्रात या, मी राजकारणात येतो”; असे नाना पाटेकर यावेळी म्हणाले. यानंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

