मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आज (१० एप्रिल) रामनवमीच्या निमित्ताने दादरमध्ये मनसेकडून शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली, त्यानंतर मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटून उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. ते म्हणाले की,‘ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपले हिंदुत्व सोडले. बाळासाहेबांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचं निर्माण करुयात.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मुळात ज्यांनी हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवलंय, त्यांना देखील जाग यावी हा देखील त्यामागचा उद्देश आहे’, असे किल्लेदार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- मनसेला मोठा झटका! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर दिला राजीनामा
- “…यामागे मोठे षडयंत्र”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालीसा पठण; मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
- शरद पवार यांचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत!
- अखेर वसंत मोरेंच्या मेसेजला रिप्लाय; राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावले!


