रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडत आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झालेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले. त्यानंतर, रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंनी अटक केली आहे.
राणे यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आता त्यांना गुन्हा दाखल असलेल्या महाड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. संगमेश्वरवरून महाडमध्ये पोहोचण्यासाठी तीन तासांचा वेळ लागेल असा अंदाज आहे. तोपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद झालेले आहेत. त्यामुळे राणेंना आजच म्हणजे मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली. त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आजचा मुक्काम महाड पोलीस ठाण्यात होईल, असे सांगण्यात येत आहे. उद्या बुधवारी राणे यांना रायगड सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे अटकेपूर्वी राणे यांचा रक्तदाब वाढल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितल्याचे जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद पठार यांनी माहिती दिली होती. त्यानंतर राणे यांचं ब्लड प्रेशर जास्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे’, असे डॉक्टरांनी सांगितलं आहे. राणेंच्या अटकेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांची तपासणी करणारे डॉक्टर म्हणाले की, ‘नारायण राणेंना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. आम्हाला आता त्यांची ब्लड शुगर चेक करता आलेली नाही. परंतु, आम्ही ब्लड प्रेशर चेक केलं असून राणेंचं बीपी वाढलेलं आहे. ब्लड प्रेशर जास्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयात दाखल करून त्यांची ईसीजी तपासणी आणि पुढील उपचार करणे महत्त्वाचं आहे’.
या सर्व घडामोडी पाहता नारायण राणे यांना आज महाड पोलीस ठाण्यात ठेवण्यात येणार की प्रकृतीच्या कारणाखाली रुग्णालयात भरती केले जाणार याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. परंतू सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, राणे हे स्वत: रुग्णालयात जाण्यास इच्छूक आहेत. प्रकृती खराब असल्याचे कारण दाखवल्यास पोलिसांना नाईलाजाने त्यांना रुग्णालयात दाखल करावेच लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- ‘छत्रपती संभाजीराजेंनासुद्धा संगमेश्वरमधून अटक केल्यानंतर औरंगजेबाचं सरकार संपलं होतं’
- नारायण राणेंना रुग्णालयात दाखल करण्याची गरज; तपासणीनंतर डॉक्टरांच मत


