🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कायमच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यात मोठं वादंग निर्माण झालं असून शिवसेनेचा मोठा रोष पाहायला मिळत आहे. नाशिक, पुणे आणि इतर काही ठिकाणी राणेंच्या आक्षेपार्ह विधानाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून रत्नागिरी पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, राजकीय क्षेत्रातील पहिलं पाऊल नारायण राणे यांनी ज्या पक्षातून टाकलं त्याच शिवसेनेसोबत त्यांचे सर्वाधिक वाद असल्याचे वारंवार समोर आले आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र असताना याच वादामुळे शिवसेनेनं राणेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. आता शिवसेनेचं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र-निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे वेगवेगळ्या प्रकरणावरून हल्लाबोल करत असल्याचं दिसून आलंय.
नारायण राणे यांचा थोडक्यात राजकीय प्रवास –
१९८५ साली नारायण राणे हे शिवसेनेकडून साली मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले होते. यानंतर आमदार, मंत्री आणि मग १९९९ साली शिवसेना-भाजपचं युती सरकार असताना ते शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले होते. शिवसेनेमध्ये असताना काही कारणांवरून वाद झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेवर खोचक टीका केल्यानंतर खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणांमधून राणेंवर बोचरी टीका केली होती.
काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांना राज्यातील विविध खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी न दिल्याने ते तिथे देखील नाराज झाले. पुढे त्यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष देखील स्थापन केला. २०१७ मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची त्यांनी स्थापना केली. अखेर कित्येक महिन्यांच्या चर्चांनंतर त्यांनी २०१९ मध्ये अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवरून खासदार देखील केलं.
शिवसेनेशी युती तुटल्यानंतर भाजपने कोकणात अधिक मजबूत होण्यासोबतच मराठा समाजातील नेतृत्व म्हणून थेट केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने नारायण राणे यांचे महत्व वाढले असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार त्यांच्या हाती देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिपद स्वीकारल्यानंतर काही दिवस नारायण राणे हे टीका-टिप्पणी पासून दूर होते. मात्र नव्याने केंद्रीय मंत्रीपदी संधी मिळालेल्या मंत्र्यांच्या विभागात काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद ऐतरेतून मात्र त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर अधिक जहरी प्रहार सुरु केला. या यात्रेतीलच एक विधान आता राणेंना भोवलं आहे.
नारायण राणे यांचं ‘ते’ विधान नेमकं काय ?
‘देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
- पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यलयात सोडल्या मांजरी
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- ‘छत्रपती संभाजीराजेंनासुद्धा संगमेश्वरमधून अटक केल्यानंतर औरंगजेबाचं सरकार संपलं होतं’
- नारायण राणेंना रुग्णालयात दाखल करण्याची गरज; तपासणीनंतर डॉक्टरांच मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
