मुंबई : नागालँडमध्ये सुरक्षा दलाने १३ नागरिक व एका जवानास अतिरेकी समजून गोळ्या घालून ठार केले. या प्रकरणाची कोर्ट ऑफ इन्क्वायरी कधी होणार? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
पुढे संजय राऊत लिहीतात, नागालँडमध्ये निरपराध्यांना गोळ्या घातल्या गेल्या तसे इतर प्रकरणांत निरपराध्यांना चौकशीत अडकवून तुरुंगात सडवले गेले. या सर्व प्रकरणांची कोर्ट ऑफ इन्क्वायरी कधी होणार? नागालँडमध्ये सुरक्षा दलांनी घातक चूक केली. त्या चुकीस केंद्र सरकारने माफी दिली. महाराष्ट्रात अशा चुका व गुन्हे केंद्रीय तपास यंत्रणा रोज करीत आहेत. फक्त नागालँडमध्ये जशी संतप्त जनता रस्त्यावर उतरली तसे इतरत्र घडले नाही. मात्र संयमाचा बांध तुटला की तेही घडेल. राजाने मारले तर जनता न्याय करते हे लिबियासह अनेक देशांत दिसले आहे.
चुकीला माफी नाही असे नेहमीच सांगितले जाते, पण ते सामान्यांच्या बाबतीत. पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कुणाकडे मागायची, असाही सवाल केला जातो. तो नागालँडच्या अमानुष प्रकरणाबाबत खराच आहे. सीमेवरील राज्य नागालँडमध्ये सुरक्षा दलाने अतिरेकी समजून १३ नागरिक व एका जवानास ठार मारल्याच्या घटनेने देश सुन्न झाला आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानात उमटलेच, पण संसदेच्या दोन्ही सभगृहांतही उमटले. तेव्हा आपले सन्माननीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी झाल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करुन या अमानुष घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
फक्त चार ओळींचा खेद व्यक्त करुन संपवावे असे हे प्रकरण नाही. १३ निरपराध नागरिक व एक जवान नाहक मारला गेला आहे. त्यांच्या हत्येचे पातक सरकारच्या डोक्यावर आहे. नागालँड हे म्यानमारच्या सीमेवरील राज्य आहे. सुरक्षा दलास म्हणे खबर मिळाली की, अतिरेक्यांची टोळी एका खासगी वाहनातून प्रवेश करणार आहे. त्यानुसार सुरक्षा दलाने ऑपरेशन ची योजना आखली. ज्या गाडीबाबत माहिती मिळाली ती गाडी थांबविण्याचा प्रयत्न करताच ती गाडी पुढे गेली. त्यामुळे सुरक्षा दलाने गाडीवर गोळीबार सुरु केला, पण गाडीची ओळख पटविण्यात चूक झाली व निरपराध मारले गेले.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली व हजारो ग्रामस्थ तेथे जमले, वणवा पेटला. आसाम रायफलचे कार्यालय संतप्त लोकांनी जाळले. सरकारी वाहनांना आगी लावल्या. आता नागालँडमधील दळणवळण, इंटरनेट व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि नागालँडसह संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अतीव दुख झाले असून त्यांनी संसदेतील निवेदनात चूक कबूल करुन खेद व्यक्त केला आहे. सरकारने खेद व्यक्त केल्याने १३ नागरिकांच्या जिवांची भरपाई होणार आहे काय? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजकारणात लगीन सराई; हर्षवर्धन पाटील-ठाकरेंची जुळली सोयरीक
- नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या अध्यादेशास खंडपीठात आव्हान; ‘मनसे’च्या सुहास दाशरथेंचा आक्षेप!
- शिवसेनेत अंतर्गत वाद; माजी जिल्हाप्रमुखांचा माजी महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप!
- रजिस्टर लग्न करत जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने सर्वांपुढेच ठेवला एक चांगला आदर्श
- शासकीय जिल्हा समित्यांच्या यादीत घोळ; नाना पटोलेंकडून निवडीला स्थगिती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

