मुंबई : शिंदे-भाजप सरकारने आज बहुमताचा प्रस्ताव 164 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 99 मते मिळाली. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सभागृहात भाषण करताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आपली जडणघडण आणि आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याबरोबरच खुमासदार भाषण करत जोरदार फटकेबाजी करत बंडखोर आमदारांवर आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर विधान भवनातून बाहेर पडता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याचदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी माध्यमांसमोर बोलताना शिंदे म्हणाले कि, सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करू. राज्यातील जनतेच्या मनातलं हे सरकार आहे. राज्यातले प्रकल्प लवकरात लवकर कसे पूर्ण होतील याकडे आमचा भर असणार आहे. केंद्र सरकार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. एकंदिरीत केंद्र आणि राज्य एकत्र येतं तेव्हा राज्याचा विकास जलद होत असतो. खाते वाटपाबाबत आम्ही केंद्रातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. तसेच ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल आम्ही आहोत, असा दावा देखील शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.
दरम्यान, मी एक शिवसैनिक असून मोकळेपणाने सांगायला घाबरत नाही. जे घडलं ते सांगतोय, असे ते म्हणाले. अगदी अमित शहांशी झालेलं बोलणंही त्यांनी सांगितलं. हम आपके पिछे चट्टान की तरह खडे रहेंगे… हे अमित शहांचं वाक्य होतं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे शिंदेंच्या या बंडामागे भाजपाचा मोठा हात होता हे सभागृहातच उघड झालं. तसेच शिवसेनेत अंतर्गत नाराजी कशी वाढत गेली हे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
महत्वाच्या बातम्या


