🕒 1 min read
मुंबई : ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली आहेत. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कंगनाला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या भाजपावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामनातील अग्रलेखाद्वारे निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
ते म्हणाले की,’प्रत्यक्षात बॉम्ब कधीच फुटत नाहीत; पण भाजपाच्याच कंगनाबेन रानौत यांनी एक बॉम्ब फोडला असून त्यामुळे भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे. कंगनाबेन यांनी जाहीर केले आहे, १९४७ साली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले नाही तर भीक मिळाली. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ सालात मिळाले. कंगनाबेनच्या या वक्तव्याचे तीक्र पडसाद देशभरात उमटले आहेत. हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ाच्या क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता.
कंगनाबेन यांना नुकतेच ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. यापूर्वी हा सन्मान हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱया कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हे देशाचे दुर्दैव आहे. स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर या राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत. शिवसेनेने राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात. महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळय़ांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातला उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल. कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ! या ऐतिहासिक विचारांशी भाजपातले वीर पुरुष सहमत आहेत काय? भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी कंगनाबेनच्या भिक्कार वक्तव्याचा धिक्कार केला आहे. हा देशद्रोहच आहे असे वरुण गांधी सांगतात. अनुपम खेर यांनीही लाजत लाजत कंगनाचा निषेध केला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, १४ ऑगस्ट १९४७ ला मध्यरात्री हा देश स्वतंत्र झाला. तेव्हा स्वातंत्र्याचे स्वागत करून राष्ट्राच्या पुनर्घटनेच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी घटनासभेत केला. ‘जग झोपले असेल तेव्हा भारत जिवंत व स्वतंत्र झालेला असेल. असा क्षण इतिहासात क्वचितच येतो. तो आल्यावर एक युग संपून दुसरे युग सुरू होते. राष्ट्राचा दीर्घकाळ दडपलेला आत्मा जागृत होतो आणि त्यास हुंकार मिळतो.” हा देश स्वतंत्र झाला तेव्हा असा क्षण आला होता. १४ ऑ.च्या मध्यरात्री देशावरील युनियन जॅक खाली उतरवला गेला. तेव्हा देशभरात उत्साह होता. तो उत्सव, तो उत्साह देशाला भीक मिळाली म्हणून नव्हता. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकमान्य टिळकांना १९०६ साली शिक्षा झाली त्या चुकीचे परिमार्जन करण्याचे ठरले. मग हायकोर्टात एक फलक लावला गेला. ”न्यायालयाने मला दोषी ठरविले असेल तरी या न्यायालयापेक्षा श्रेष्ठ असे न्यायालय आहे व त्याच्यापुढे मी निर्दोष आहे,’ या अर्थाची लोकमान्यांची धीरोदत्त वाक्ये या फलकावर कोरण्यात येऊन त्याचे सन्मानपूर्वक अनावरण मुख्य न्यायाधीश छगला यांच्या हस्ते झाले. लोकमान्यांना शिक्षा झाली तेव्हा आपण कुमार होतो आणि रागामुळे हातात धोंडा घेऊन तो ब्रिटिश साम्राज्यावर फेकावासा वाटला, असे छागला म्हणाले होते. हा संताप, ही चीड म्हणजेच स्वातंत्र्यसंग्राम. त्यातून गुलामीच्या बेडय़ा तुटल्या. कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
