🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतावर कुरघोडी करणं ही चिनी ड्रॅगनची जुनीच सवय आहे. गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीन मध्ये संघर्ष वाढला होता. कोरोना काळात देखील चीनने भारतीय भूभागात घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. यावेळी दोन्ही देशाचे सैन्य एकमेकाला भिडलं देखील होतं. यात भारताचे २० जवान शहिद झाले होते. तर, याहून दुप्पट चिनी सैनिकांना भारतीय फौजेने यमसदनी धाडलं होतं.
दोन्ही देशाच्या सैन्यांमध्ये तब्बल आठ चर्चेचा फेऱ्या झाल्या. तर, नवव्या फेरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सैन्य मागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यानुसार भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सैन्याने देखील याबाबत घोषणा केली आहे.
आता LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशाच्या सैन्याने मागे फिरण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचे फोटो व व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. १९ फेब्रुवारी पर्यंत दोन्ही देशांचं संपूर्ण सैन्य माघारी फिरेल, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि कपिल सिब्बल हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
‘सैन्याच्या पराक्रमाची आणि शौर्याची ओळख असलेल्या कैलास पर्वत रांगा जिथे भारतीय सैन्य चीनपेक्षा खूपच उंचावर होते. यामुळे चीन घाबरत होता, थरथर कापत होता. आता या करारानुसार मोदी सरकारने पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडच्या कैलास पर्वत रांगांमधून आपले सैन्य हटवण्याचा दुर्दैवी निर्णय का घेतला आहे?’ असा सवाल देखील आज काँग्रेसने पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.
तर, ‘ मोदी सरकारने गलवान खोरे आणि पँगाँग सरोवराच्या परिसरातील आपली जमीन चीनला दिली. यामुळे देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण झालेला नाही का? मोदी सरकारने आपल्या सैन्याचे शौर्य आणि पराक्रम कमी लेखण्याचा प्रयत्न का केला? पूर्ण देशाला शांतता हवी आहे. पण देशाच्या जमीन चीनला देऊन शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते का? पाँगाँग सरोवरापासून ते फिंगर ४ पर्यंत आपल्या सैन्याची पोस्ट आहे. भारतीय सैन्य फिंगर ३ पर्यंत तिथून मागे का हटवले? मोदी सरकार भारताच्या अखंडतेशी खेळ का करत आहे?’ असे गंभीर प्रश्न यावेळी करण्यात आले आहेत. तर, सरकारने चीनसमोर लोटांगण घातल्याची बोचरी टीका देखील यावेळी ए.के.अँटनी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाविद्यालयीन निवडणुका ; नेतृत्वोदय, संघटना व राजकारण
- ‘…म्हणूनच “जेल पर्यटन” चालू केले असावे! जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?’
- ‘कोरोनामुळे अनेकांनी जवळची लोकं गमावली, त्यामुळे शिवजयंती…’
- ‘मोदींना “ते” दिसतं पण अडीच महिने शेतकरी हक्कांसाठी आंदोलन करतायत ते दिसलं नाही’
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
