मुंबई : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर कोणत्याही भाजप नेत्याला भेटणार नसल्याचं सांगितलं होत. मात्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेतली आणि आमच्यात शेतकरी आंदोलन, सीमा सुरक्षा यावर आपण चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी भाजपवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंजाबच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना डावलून काँग्रेसने दूर केलेल्या व आमदारांचा पाठिंबा गमावलेल्या अमरिंदर सिंग यांच्याशी सीमा सुरक्षेबाबत चर्चा करणे बरोबर नाही. देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, पण अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय? मुख्यमंत्रिपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली. देशाच्या गृहमंत्र्यांनाही त्याबद्दल जी बहुमोल माहिती मिळाली ती देशाला समजेल काय? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानेच अमरिंदर यांच्याप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते!, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर अमरिंदर दिल्लीस आले. ”भाजप नेत्यांना तुम्ही भेटणार काय?” या प्रश्नावर अमरिंदर म्हणाले, ”मी भाजप नेत्यांना भेटणार नाही. दिल्लीत माझ्या सामानाची आवराआवर करायला आलो आहे.” पण लगेच दुसऱया दिवशी ते अमित शहांना भेटले. शेतकरी आंदोलन, सीमा सुरक्षा यावर आपण चर्चा केली, असे धादांत खोटे ते बोलतात. हे विषय खरोखरच महत्त्वाचे असतील तर गृहमंत्र्यांनी पंजाबच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांशीच चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली? केंद्र सरकार हे नवे पायंडे पाडत आहे ते बरे नाही. काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील, पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरटय़ा मारण्याचे उद्योग सुरू आहेत, असं राऊत सामनामध्ये म्हणाले आहेत.
पंजाबात सध्या जे घडवले जात आहे ते प. बंगाल, महाराष्ट्राच्या बाबतीतही घडविण्याचा प्रयत्न होतच असतो. प. बंगालात भाजप विरोधी पक्षात आहे. तेथेही अनेकदा लोकप्रिय सरकारला डावलून केंद्राचे लोक विरोधी पक्षाला चर्चेसाठी बोलावतात. विरोधी पक्षाच्या सूचनेनुसार प. बंगालसंदर्भात निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे लोक ऊठसूट दिल्लीस जातात व राज्याच्या बाबतीत केंद्राचे कान भरतात. जणू विरोधकांचे नित्यनेमाने दिल्लीत डोहाळे जेवणच असते व त्यासाठी सर्व लोक दिल्लीस जात असतात. पंजाबात काँग्रेस फुटली तशी प. बंगालात भाजप फुटला आहे, असंही राऊत सामनामध्ये म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक दिवस भाजप रस्त्याने चालणाऱ्या माणसावर सुद्धा ईडीची कारवाई करेल’, शिवसेनेचा टोला
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार- अजित पवार
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ


