मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. जवळपास दीड तास ही बैठक सुरू होती.
या भेटीवरून विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली हे चांगलं आहे. नाहीतर आपल्याकडे जी प्रथा पडली आहे, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं, ती योग्य प्रथा नाही’, असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, अशा चर्चांमधून महाराष्ट्राचा फायदाच होईल, असे देखील फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला केंद्र सरकारशी समन्वय साधण्याचा सल्ला दिला. ‘महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील, तर ते चांगलंच आहे. आम्ही तर हेच नेहमी सांगत असतो. कारण पंतप्रधान महाराष्ट्राबद्दल सकारात्मक असतात. राज्य आणि केंद्र यांनी आपापसांत संबंध चांगले ठेवले, तर राज्याचा फायदा होतो. आपल्याकडे जी प्रथा आहे की उठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचं, ही प्रथा योग्य नाही. आज मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला, जाऊन भेट घेतली हे चांगलंय’, असे ते म्हणाले.
‘अशा प्रकारच्या बैठकांमधून समन्वय साधला जातो. राजकारण निवडणुकीपुरतं असतं. पण इतर काळ समन्वयाची भूमिका असली, तर राज्याचा फायदा होतो. केंद्र सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र सातत्याने राहिला आहे. त्यासंदर्भात भूमिका योग्य ठेवली, तर महाराष्ट्राचा त्यात फायदाच आहे’, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपने तातडीची बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यात भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं तरी दिल्लीतील ठाकरे-मोदी भेटीच्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाची दिशाभुल करणारी राजकीय भेट, मोदी-ठाकरे भेटीवर विनायक मेटे यांची टीका
- सकारात्मक! उस्मानाबाद जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये लक्षणीय वाढ
- ग्लेन मॅक्सवेल लवकरच होणार भारताचा जावई, पहा कोण आहे ‘नवरी’
- मोदी मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केला विश्वास व्यक्त
- ‘शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

