🕒 1 min read
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेत एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली असल्याचा दावा करत यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातील पत्र पाठवले असून सरकारला उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करायचे आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. भाडेकरू घर सोडून जाताना ज्या प्रकारे तोटी आणि नळी घेऊन जातो त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले जात असल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
त्याबरोबरच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. “खुर्ची तुटेपर्यंत मुख्यमंत्री खुर्ची अडवून बसले आहेत. खुर्ची तोडण्यापेक्षा आम्हाला बारा कोटी जनतेच्या प्रश्नांची अधिक चिंता आहे. तुम्ही काय शाळेचे ठाकूर आहात का? ज्याला दोन हात नाहीत. बहुमत असेल तर दोन्ही हातांनी दाखवा असे आवाहन देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानमंडळ सचिव यांनी आमच्या सूचनांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता ठाकरे सरकारकडे आपलं सरकार वाचवण्याइतकं आमदारांचं संख्याबळ नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार टिकणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्या विशेष अधिवेशनामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलंय. यासंदर्भात महाविकासआघाडी ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर होणाऱ्या मध्ये सुनावणीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
