🕒 1 min read
मुंबई : संजू सॅमसन हा सर्वात आश्वासक खेळाडूंपैकी एक मानला जातो आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात आहे, पण त्याचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. त्याच्यानंतर पदार्पण केलेल्या अनेक युवा खेळाडूंनी नियमितपणे आपले स्थान निर्माण केले आहे, परंतु संजू अजूनही संघर्ष करत आहेत. भारताचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनीही सॅमसनला टीम इंडियात आपले स्थान पक्के करता येत नसल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
२०१५मध्ये भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या केरळच्या सॅमसनला आतापर्यंत १३ टी-२० सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. यादरम्यान सॅमसनने १४.५०च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही फक्त १२२च्या आसपास आहे.
स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान गावसकर म्हणाले, ”काही वेळा सॅमसन अधिक आक्रमक होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची विकेट गमावतो. प्रत्येकजण अधिक संधींना पात्र आहे. परंतु तुम्हाला त्यांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा लागेल. आपल्या सर्वांना माहीत आहे, की भारताकडून खेळताना त्याच्याकडे जबरदस्त शॉट निवडण्याची क्षमता आहे. त्याला पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचे असते, तुम्हाला स्वतःला सेट करण्याची संधी द्यावी लागेल. जर त्याची शॉट निवड चांगली असेल तर तो अधिक सातत्यपूर्ण असेल. मग त्याच्या संघातील स्थानावर कोणीही शंका घेणार नाही.”
आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी १४६.७९च्या प्रभावी स्ट्राइक रेटने ४५८ धावा करणाऱ्या संजू सॅमसनचा आयर्लंड दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या दोन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्यात त्याला स्वत:ला सिद्ध करायचे आहे. अनेक खेळाडू संघात स्थान मिळवण्यासाठी झुंजत आहेत, अशा परिस्थितीत सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली तर त्याला भारतीय संघासाठीही आपली क्षमता दाखवावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
