मुंबई:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. ९ डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, शिवसेनेनं उद्या पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केला आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, होत असलेलं आंदोलन आणि आंदोलनाला राजकीय पक्षांकडून दिला जाणारा पाठिंबा याबद्दल आश्चर्य वाटत आहे. जे पक्ष निवडणुकीत सातत्यानं पराभूत होत आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर आपलं राजकारण करायचं आहे. केंद्र सरकारनं कृषी विधेयक संसदेत मांडली. त्यावेळी प्रचंड गदारोळ झालेला पाहायला मिळालं. या विधेयकांना शिवसेनेनं लोकसभेत पाठिंबा दिला होता. तर राज्यसभेत मात्र, भाषणातून विरोध व्यक्त करत सभात्याग केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही या तिन्ही विधेयकांना स्पष्टपणे विरोध दर्शवला नव्हता. शिवसेनेच्या याच भूमिकेवरून मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे.
केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे शहरात दिल्लीप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच ?
- घराबाहेर बॅरिकेट्स लावत अखिलेश यादवांना शेतकरी आंदोलनात सामील होण्यापासून रोखलं !
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- शुटिंग दरम्यान मनीष पॉलला कोरोनाची लागण
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती


