औरंगाबाद : शहरातील काल्डा कॉर्नर याठिकाणी असलेले अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने तत्काळ पाडण्यात यावे यासाठी नरेश पाखरे यांनी मनपा मुख्यालयाच्या छतावर चढून उडी मारण्याचा तर जय कांबळे यांनी स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार वेळीच रोखण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. दोघांनीही मनपा उपायुक्त रविंद्र निकम यांच्या विरोधात घोषणा देत आत्महत्येचा प्रयत्न केला.
काल्डा कॉर्नर येथील अतिक्रमण पाडावे व रविंद्र निकम यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. या दोन प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. यावेळी नरेश पाखरे म्हणाले, ‘आम्ही गेल्या तीन वर्षांपासून काल्डा कॉर्नर येथील प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत. मात्र, उपायुक्त रवींद्र निकम यांनी आम्हाला सांगितले की संपूर्ण शहरच बेकायदेशीर आहे तर आम्ही संपूर्ण शहराची पाडापाडी करायची का असा उलट सवाल आम्हाला विचारला?’
काल्डा कॉर्नर येथील बांधकाम अनधिकृत आहे. तसेच आपण मनपा आयुक्तांची यासंदर्भात आपण वारंवार भेट घेतली आहे. मात्र, भूखंड माफियांविरोधात कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही. त्यामुळेच आज आम्ही हा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. काल्डा कॉर्नर येथील अनधिकृत बांधकाम तत्काळ पाडण्यात यावे तसेच यासंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर चौकशी व्हावी अन्यथा आम्ही पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न याठिकाणीच करू असा इशारा जय कांबळे यांनी दिला.
काय आहे प्रकरण?
काल्डा कॉर्नर येथे युसुफ मुकाती यांचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. मागील तीन वर्षांपासून अतिक्रमणे हटविण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम कोणतीच कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे जय कांबळे यांनी आत्मदहन आणि नरेश पाखरे यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरात अनधिकृत बांधकामांच्या समस्येने डोके वर काढले आहे. मनपा आणि पोलिसांचे दुर्लक्ष आणि एकूणच प्रशासनाची ढिलाई यामुळे हा प्रश्न सुटण्याएवजी वाढतच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हद्दच झाली! आईचे नाव बदलण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच
- महिला अधिकाऱ्यांनी पकडला दीड लाखांचा गुटखा
- जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २३ ठिकाणी टाकणार जलवाहिनी
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व


