मुंबई: महाराष्ट्राला वाकवणे व झुकवणे दिल्लीश्वर व त्यांच्या चमच्यांना कधीच जमले नाही. शिवरायांचे राज्य श्रमिकांचे होते. त्याच श्रमिकांनी लढून मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. तोच श्रमिक बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट पाठीराखा बनला. महाराष्ट्र कधीच रडत बसला नाही. हीच शिवरायांची प्रेरणा. मुजरे आणि हुजरे करणाऱ्यांत महाराष्ट्राची गणना झाली नाही, हेच खरे शिवचरित्र. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य दिले, ते शौर्य आजही भवानी तलवारीसारखे धारदार व खणखणीत आहे. आजच्या शिवजयंतीस आम्ही महाराष्ट्राच्या दुश्मनांना त्याची जाणीव करून देत आहोत. महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
आज शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन अनेक कवींनी, शाहिरांनी, इतिहासकारांनी आपापल्या वकुबानुसार केले आहे. नेवाशाला राहणारा परमानंद कवी हा महाराजांचा विश्वासू होता. त्याने आपल्या ‘शिवभारत’ ग्रंथात ‘चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम् ‘ असे म्हटले आहे. बखरकाराप्रमाणे शंकराचा अवतार न मानता तो शिवाजीराजांना विष्णूचा अवतार म्हणतो. परमेश्वर जसा सर्वांच्या वर दहा अंगुळे उरला असे सांगतात तशीच गोष्ट शिवाजी महाराजांची आहे. त्यांची कितीही चरित्रे लिहिली तरी ‘शिवाजी महाराज’ त्या सर्व चरित्रांवर दहा बोटे शिल्लक आहेतच. महाराष्ट्राला इतिहास आहे तसा इतर प्रांतांना नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे, कारण येथे शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांनी औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन स्वराज्य स्थापन केले. “औरंगशहाला स्वतःलाच दिल्लीत कोंडीन” असे शिवाजी महाराजांचे वक्तव्य इंग्रजी इतिहासात सापडते. महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही. दिल्लीची गुलामी पत्करत नाही या विचारांची बीजे, “औरंगशहाला दिल्लीतच कोंडीन” या शिवरायांच्या मर्दानी बाण्यात आहेत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवाजी महाराजांनी जे ‘स्वराज्य’ स्थापन केले तिच्या बुडाशी काही थोर तत्त्वे होती. शिवचरित्राचे खरे सार काढले तर त्यातून दोन प्रमुख सूत्रे बाहेर पडतात. एक म्हणजे परचक्राचा हरतऱहेने विरोध करून स्वराज्य स्थापायचे आणि दुसरे, स्वराज्याचा पाया मुख्यतः कष्टकरी जनतेवर आधारून राज्य चालवायचे व स्वराज्याला आकार द्यायचा. शिवकालीन परचक्र म्हणजे मोगलांचे आक्रमण, दक्षिणेतील बादशाह्यांचे हल्ले. शिवाजी महाराजांनी ते सर्व उलथवून पाडले. हिंदुस्थानातल्या वतनदार, जहागीरदारांनी परचक्राला साथ दिली, जनतेचा छळ केला. म्हणून शिवाजीराजांनी मराठी राज्य स्थापन करताच वतनदाऱया व जहागिऱयाच रद्द केल्या आणि सैन्यानेसुद्धा गावांमधून काही वस्तू घेतल्यास तिची किंमत दिली पाहिजे असा हुकूम केला. पिकावरचा सारा मक्ता देऊन वसूल करण्याची पद्धत बंद केली. सैरावैरा फिरणारे, भटके कातकरी, बेरड जमातींना किल्ल्यावर पहारेकऱयांच्या नेमणुका करून दिल्या व त्यांना कसायला शेत देऊन त्यांच्या वसाहती केल्या. त्यामुळे त्यांना प्रामाणिकपणाने आयुष्य जगण्याची संधी व साधने मिळाली.
शिवाजी महाराजांचे राजकारण म्हणजे फक्त ‘उत्सव’ नव्हते. त्यांनी कणाकणांत स्वाभिमान निर्माण केला. तो आजही कायम आहे. म्हणूनच महाराष्ट्राला वाकवणे व झुकवणे दिल्लीश्वर व त्यांच्या चमच्यांना कधीच जमले नाही. महाराष्ट्र सदैव लढतच राहिला . शिवरायांचे राज्य श्रमिकांचे होते. त्याच श्रमिकांनी लढून मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. तोच श्रमिक बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट पाठीराखा बनला. महाराष्ट्र कधीच रडत बसला नाही. हीच शिवरायांची प्रेरणा संभाजीराजांना दगलबाजीने मारल्यावर सेनापती मेला म्हणून महाराष्ट्र रडत बसला नाही. उलट सूडाने आणखी पेटून उठला. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य दिले , ते शौर्य आजही भवानी तलवारीसारखे धारदार व खणखणीत आहे. आजच्या शिवजयंतीस आम्ही महाराष्ट्राच्या दुश्मनांना त्याची जाणीव करून देत आहोत. महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- एमआयएमने दिलेल्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा एक राजकीय…”
- भारीच ना..! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; वर्ल्डकपपूर्वी ‘या’ स्पर्धेची झाली घोषणा!
- रामदास आठवलेंनी केली AIMIM साठी खास कविता; म्हणाले…
- “सोनिया मॅडम चिडतील या भीतीने उद्धव ठाकरे…”, भातखळकरांचा टोला
- IND vs SL : बंगळुरुच्या खेळपट्टीबाबत ICCनं दिला मोठा निर्णय; केली कडक कारवाई!


