मुंबई : मागच्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी सुरू केली होती आणि पक्षाच्या ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर ३० जून रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदाची शपथ दिली होती. त्यामुळे शिंदे सरकार सध्या सत्तेत आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सध्या राज्यात शिवसेना आणि शिंदे गट, असा सामना रंगला आहे. शिवसेना खासदार देखील आता बंडाच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरेंकडे राहिलेले १५ पैकी अनेक आमदार तसेच १२ हून अधिक खासदार देखील बाहेर पडतील. भरकटलेलं जहाज आणि बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते एवढीच शिवसेना आता शिल्लक राहिली आहे. शिवसेनेची अवस्था काँग्रेसपेक्षा वेगळी होईल, असं वाटत नाही. तसेच, हे सरकार विचाराच आणि विकासाचं असून राष्ट्रवादीच्या नेत्यांची मध्यावधी निवडणुकांचे भाकित नैराश्यातून केले आहे.”
तसेच ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात देखील चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. निलेश राणे यांच्याकडून सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. शिवसेनेतील बंडखोरीलाही उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचे निलेश राणेंनी म्हटले आहे. रोज उठून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाची फक्त रड रड सुरू आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
मातोश्रीवरील बैठकीला ७ खासदार गैरहजर
शिवसेनेत आमदारांनी बंड पुकारल्यानंतर पक्षाचे खासदारही शिंदे गटात जाणार असल्याचा बातम्या समोर येत होत्या. शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदारांनीही पक्षातील खासदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. तसेच भाजपने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यामुळे पक्षप्रमुखांनी खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला तब्बल ७ खासदार गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

