🕒 1 min read
Shiv Sena । मुंबई : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये काल मोठा सत्ताबदल झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासोबतच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आहे. महाआघाडीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, हम आणि डावे पक्ष आहेत. यानंतर शिवसेना पक्षाच्या सामानाच्या आजच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे.
काय म्हंटल आहे अग्रलेखात ?
नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली. त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही. तेजस्वी यादवही बेधडक आहेत. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे! समझने वालों को इशारा काफी है!
बिहारात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली आहे. बिहारातदेखील महाराष्ट्राप्रमाणेच ‘शिंदे’ गट वेगळा करून भाजपचे दिल्लीश्वर नितीश कुमार यांना मात देण्याचे कारस्थान करीत होते. त्यासाठी नितीश कुमार यांचे ‘शिंदे’ आर.सी.पी. सिंग यांना हाताशी धरून पोखरापोखरीचे काम सुरूच केले होते, पण नितीश कुमार यांनी भाजपलाच धोबीपछाड देणारी पलटी मारली आहे. बिहारात भाजपबरोबरची युती तोडल्याचे ‘जेडीयू’ने मंगळवारी जाहीर केले. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मंगळवारी राजीनामा सोपवला.
बुधवारी नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाची तर ‘राजद’चे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नव्या ‘महागठबंधन’ सरकारमध्ये जदयू, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससह इतर घटक पक्षांचा सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष विश्वासघातकी असल्याचे मत ‘जेडीयू’ने व्यक्त केले. भाजप नितीश कुमार यांच्या पक्षालाच सुरुंग लावायला निघाला, पण तो खेळ भाजपवर उलटला आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा लांबलेला पाळणा थोडा हलू लागला असतानाच बिहारात त्यांच्या सत्तेच्या पाळण्याची दोरीच तुटली.
मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू युती होती, पण निवडणुकीत नितीश कुमारांचे उमेदवार पाडण्याचा उद्योग भाजपने केला. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांच्या ‘जेडीयू’ला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या व भाजपने मेहरबानी खात्यात नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिले असे चित्र निर्माण केले. केंद्रीय मंत्रिमंडळात ‘जेडीयू’चे राज्यसभा सदस्य आर.सी.पी. सिंग यांचा समावेश नितीश कुमार यांच्या मनाविरुद्ध होता, पण सिंग यांना बळ देऊन भाजपास बिहारात नितीश कुमारांना अस्थिर करायचे होते. हे लक्षात येताच नितीश कुमार यांनी दिल्लीशी संपर्कच तोडला. दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे दाखवले व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या किमान पाच बैठकांना गैरहजर राहिले. महाराष्ट्रातील सध्याच्या गुडघेटेकू मुख्यमंत्र्यांनी हा ‘बाणा’ समजून घेतला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- Raosaheb Danve | महिलांना पुढील विस्तारात संधी मिळेल – रावसाहेब दानवे
- Sanjay Rathod । एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात संधी का दिली; संजय राठोडांनीच सांगितलं यामागील कारण
- Chitra Wagh | “…तर तुम्हाला करुणा मुंडेंची माफी मागावी लागेल” ; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
- Sanjay Shirsat | मंत्रिमंडळ विस्तारावर आम्ही नाराज नाही – संजय शिरसाट
- NCP VS BJP । “भाजपने लोकांच्या घरात डोकावून बाप कोण सांगण्याचा… “; शिवसेनेला सर्मथन देत राष्ट्रवादीचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

