मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालेले आहे. ईडीची कारवाई, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक, भाजप-राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, किरीट सोमय्यांचे आरोप, दरेकरांची असभ्य भाषेत टीका या सर्व प्रकरणांमुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातून नेत्यांची एकमेकांवर शब्दांची चिखलफेक सुरू आहे. राणे कुटुंबीयांकडून होणारी विखारी टीका, चंद्रकांत पाटील यांचा आरोप, संजय राऊतांचा पलटवार यामुळे कोथळा, तलवार यासारख्या ऐतिहासिक शब्दांचा वापर करत धारदार वाकयुद्ध रंगलेले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर विचारवंतांकडून चिंता व्यक्त होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आताच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. पवारांच्या हस्ते आज शनिवारी मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी शरद पवार यांनी मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या.
‘राज्याच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी मोठे योगदान दिलं. त्या अनेकांपैकी काहींची आठवण ही प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते, त्यात मृणालताईंचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. मृणालताई गोरे सदनात असताना अनेकदा वाद व्हायचे. पण ते राज्याच्या हिताचे असायचे. सुसंवाद पाहायला मिळायचा, तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते’ असे वक्तव्य पवारांनी केले.
काय आहे कोथळा प्रकरण?
पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जुन्नर येथील एका कार्यक्रमात बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही. पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करताना, ‘कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का?’ असा सवाल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- काल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान अन् आज जयंत पाटील आणि फडणवीस एकाच गाडीत
- राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, काहीही चमत्कार होऊ शकतो – विखे
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नेतृत्वाच्या बदलाच्या चर्चांना आले उधाण
- ‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान बीकेसीतील पूल दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी दिले?’


