पुणे : शस्त्रक्रियेनंतर सक्रिय झालेले खा. शरद पवार काही दिवस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. शरद पवार राष्ट्रीय पातळीवर राजकीय खेळी करण्याचे प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या असून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीने सस्पेन्स अधिक वाढलाय. यासोबतच, त्यांनी भाजपविरोधी प्रादेशीक पक्षांच्या १५ ते २० नेत्यांची बैठक देखील घेतली. यात शिवसेना आणि काँग्रेसला निमंत्रण नव्हतं. पवार हे काँग्रेसविरहित भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
आता या सर्व चर्चांवर खुद्द शरद पवार यांनी भाष्य केलंय. ‘आघाडी म्हणून आम्ही आत्ता बसलो नाही, पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. मी त्या बैठकीतही ते मांडलं. आघाडीचा चेहरा कोण असावं यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही. पण मला वाटतं सामूहिक नेतृत्व हे सूत्र पुढं ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल,’ असं शरद पवार म्हणाले.
यासोबतच, ‘शरद पवार यांनी फार वर्षे असले उद्योग केले आहेत. सध्या यामध्ये पडायचं नाही. त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, त्यांना शक्ती देणं, त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हीच माझी भूमिका असेल. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनतेला काही पर्याय द्यावा अशी लोकांमध्ये भावना आहे. ही लोकइच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. ती जबाबदारी आम्हाला निश्चित पूर्ण करावी लागेल,’ असं देखील पवार म्हणाले.
दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यातून भाजपची ताकत देशभरात वाढली असून विरोधीपक्ष एकजूट राहिले नाहीत तर भाजपचा पराभव करणे अशक्य असल्याचे अधोरेखित होते. मोदी आणि भाजपची ताकत सर्व पक्षांना ठावूक आहे मात्र मतांची होणारी विभागणी ही भाजपच्या पथ्यावर पडत आहे असा संकेत देखील पवारांच्या बोलण्यातून मिळत आहे.
यासोबतच जर खरंच पवार यांनी कॉंग्रेसच्या बाबत जे सांगितले तेच त्या बैठकीत बोलले असतील तर भविष्यातील संधी ओळखून कॉंग्रेसला देखील पुनर्बांधणी करून नव्या जोमाने त्यांना उभा राहावे लागेल असे पवारांना सुचवायचे असू शकते. पवारांना त्यांचे कार्यकर्ते हे भावी पंतप्रधान म्हणून पाहत असतात,काही संजय राऊत यांच्यासारखे नेते त्यांना युपीएच्या अध्यक्षपदी पाहू इच्छितात तर काहींना ते राष्ट्रपती व्हावेत अशी देखील इच्छा आहे. मात्र पवारांचे आजचे एक वाक्य पाहिले तर पवारांनी त्यांची आगामी वाटचाल कोणत्या दिशेने असेल याचे संकेत दिले आहेत. विरोधी पक्षांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, त्यांना शक्ती देणं, त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हीच माझी भूमिका असेल असे पवार म्हणाले. यामुळे आता आगामी काळात पवार हे मार्गदर्शन करण्याशिवाय आणि या सर्व पक्षात समन्वय कसा राहील हे पाहण्याशिवाय आता प्रत्यक्ष कोणतीही मोठी जबाबदारी स्वीकारणार नाहीत का असा सवाल उपस्थित होत आहे.
पर्यायी आघाडी उभी करायची असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच करावी लागेल असं पवारांनी आज सांगितले याचा अर्थ नेमका घायचा झाल्यास कॉंग्रेस शिवाय आज विरोधी पक्षांची एकजूट होणार नाही यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झालं असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. सामुहिक नेतृत्वाचा उल्लेख पवारांनी केला तर वेगवेगळ्या प्रांतातील विविध विचारधारा असणाऱ्या पक्षांना सर्वमान्य होईल असे नेतृत्व विरोधी पक्षांकडे कुणी आहे का असा सवाल उपस्थित होतो मात्र चाणाक्ष पवारांनी याबाबत जास्त चर्चा होऊ नये म्हणून आघाडीची चर्चाच केली नसल्यामुळे नेतृत्वावरही चर्चा केलेली नाही असं म्हणून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान,विरोधी पक्षांना शरद पवार जरी मार्गदर्शन करणं, त्यांना शक्ती देणं हीच आपली भूमिका असेल असे सांगत असले तरीही ते एक योद्धा म्हणून परिचित आहेत. जनतेचे त्यांच्यावर असणारे प्रेम आणि विश्वास यातून भविष्यात काही संधी निर्माण झाल्यास ती जनतेच्या आग्रहास्तव त्यांना स्वीकारावी लागेल असं देखील बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या पुण्यातील नव्या कार्यालयाला शरद पवारांनी दिली भेट; ‘त्या’ वादावर केलं उपरोधिक भाष्य
- ‘प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा’
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘काही जणांची CBI चौकशीची मागणी केल्यावर संजय राऊतांच्या छातीत कळ का आली ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

