पुणे : तालुक्याचा आर्थिक कणा आणि शेतकऱ्यांचा राजवाडा अशी ख्याती असलेल्या वेणूनगर-गुरसाळे येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. याबाबतच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी कारखान्याच्या संचालकांची आज शुक्रवारी 1 ऑक्टोंबर रोजी पुणे येथे बैठक बोलावली आहे. शेतकरी, कामगारांची थकीत देणी, नव्याने कर्ज उभारणी, कारखाना चालू करणे, नेतृत्वाच्या अनुषंगाने असलेलीचर्चा आदींविषयी या बैठकीत काय निर्णय होतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा विठ्ठल परिवाराचे मुख्य सत्ताकेंद्र आहे. मात्र, हा कारखाना आर्थिक अडचणींच्या गर्तेत अडकला आहे. गेल्या हंगामात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या कारखान्यास थकहमीसह सर्वतोपरी सहाय्य केले होते.
तत्कालीन चेअरमन स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे आकस्मित निधन झाले आणि एकूणच यंत्रणेची घडी विस्कटली. क्षमतेच्या मानाने अत्यल्प गाळप करून कारखाना बंद झाला. त्यानंतर कामगारांचे पगार, सभासदांची ‘एफआरपी’, ऊस तोडणी-वाहतुकीची बिले अशी कोट्यवधींची देणी थकली. चेअरमन भगीरथ भालके यांनी कारखान्याच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र,अगोदरच प्रचंड थकबाकी असल्याने यश आलेले नाही. कारखाना प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला असताना ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यातच गेल्या काही महिन्यांमध्ये तालुक्याच्या ‘राष्ट्रवादी’त बेकी निर्माण झाली आहे. युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने उघडपणे चेअरमन भगीरथ भालके यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. संचालक मंडळातही मतभेद वाढल्याने कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्नही एकजुटीने होणे अवघड होऊन बसले आहे. मागील थकीत देणी आणि कर्जाचा डोंगर असल्यामुळे चालू गळीत हंगाम तोंडावर आला तरी कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने कसल्याच हालचाली दिसत नाहीत.त्यामुळे सभासद कामगार, विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांसह सर्वच घटकांमध्ये कमालीची अस्वस्थता जाणवत आहे. आजवर विठ्ठल परिवाराला खा.शरद पवार यांनी नेहमीच पाठबळ दिलेले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आज शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक पुणे येथे बोलावली आहे. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत तरी सकारात्मक निर्णय होऊन मागील देणी आणि चालू हंगामात कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने ठोस तोडगा निघणार का ? याची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- ‘काँग्रेस झोलबाज, शिवसेना दगाबाज’ आशिष शेलारांचा घणाघात
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ


