🕒 1 min read
मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.
विधेयक संमत करून घेण्यसाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.
तर, कृषी विधेयकासह अन्य महत्वाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असं सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचं पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडलं गेलं. किमान सदस्य काय नियम सांगत आहेत. हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापतींकडून होती. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही.
त्यांनी तातडीने आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर केलं. सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आलं. गेल्या ५० वर्षांत पीठासीन अधिकाऱ्याचं असं वर्तन मी पाहिलं नाही, अशी टीका करतानाच या विधेयकावर हवी तशी चर्चा होऊ दिली नाही. सत्ताधाऱ्यांनी घडू दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी विरोधी विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी देखील शरद पवारांनी यावेळी केली आहे.
शरद पवार करणार दिवसभर अन्नत्याग!
“राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढले. सगळ्या सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी काल संध्याकाळपासून उपोषण केलं. आपल्या मनातील भावना त्यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला.
सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं. आज सदस्यांनी अन्नत्याग केला. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार आहे. त्यांच्या अभियानात मी सहभागी होणार आहे,” असं शरद पवार म्हणाले आहेत. यामुळे आता केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध कायम ठेवला असून या विधेयकाच्या राज्यसभेतील घडामोडींवेळी हजर नसलेल्या शरद पवार यांनी देखील आपली भूमिका जाहीर केल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है’ : खासदार राजीव सातव
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- ‘शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा’
- मला देखील निवडणूक आयोगाची नोटीस : शरद पवारांचा मोठा खुलासा
- मोठी बातमी: शरद पवार देखील करणार अन्नत्याग!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
