🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना कंगनाने या आंदोलकांना ‘दहशतवादी’ म्हटले आहे.
कृषी विधेयावरुन पंजाब आणि हरयाणात आंदोलन चिघळले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार असून शेतीमालाची खरेदी सरकार करणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
या ट्वीटला रिट्विट करत कंगना राणावत म्हणाली, ‘पंतप्रधान मोदीजी, जे झोपले आहेत त्यांना जागे करता येईल. पण जे झोपेचे सोंग घेत आहेत त्यांना कसे जागे करणार? तुम्ही कितीही समजवून सांगितले तरी त्यांना काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले गेले. प्रत्यक्षात एकाही व्यक्तीचे नागरिकत्व कायद्याने हिरावले गेले नाहीये’.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून कंगना रनौतसह भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘हा देशाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले असून नटीच्या प्रेमाखातर कोणी फुले उधळत असतील तर इतिहास त्यांना माफ करणार नाही’ असा घणाघात देखील केला आहे.
सामना अग्रलेख :
हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? किसानांचा अवमान हा सीमेवरील जवानांचाही अवमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या लाखो कष्टकऱ्यांचा अवमान आहे. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारविरोधी उभ्या ठाकलेल्या बार्डेली सत्याग्रहातील शेतकऱ्यांचा अवमान आहे.
त्या अवमानावर नटीच्या प्रेमाखातर कोणी फुले उधळत असतील तर इतिहास त्यांना माफ करणार नाही.आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक विधेयक संसदेत आणले.
हे विधेयक क्रांतिकारक, ऐतिहासिक, इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना दुसरे स्वातंत्र्य मिळवून देणारे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. ते बरोबर असेलही. पाशवी बहुमत, जोरजबरदस्तीच्या दंडेलीवर हे विधेयक मंजूर करून घेतले. पण पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे? शेतकऱ्यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल.
‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत असे आम्हाला कधीच म्हणायचे नाही.
महत्वाच्या बातम्या
- वरुणराजा कोसळणार : पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
- मनसे सरचिटणीस संदीप देशपाडेंना अटक!
- राष्ट्रवादीने के.के.रेंज साठी भूसंपादन होणार नाही असा कागद जनतेला दाखवावा- शिवाजी कर्डीले
- कंगना राणावत नंतर आता आठवलेंचा पायल घोषलाही पाठिंबा
- दुःखद: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनाने निधन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
